
सावंतवाडी : फॅक्टरी, उद्योग येतीलच त्यातून रोजगार मिळेल. मात्र, आपला रोजगार आपण विसरत आहोत. सिंधुदुर्ग व रत्नागिरी हा भाग डोंगरी असल्याने शिक्षक भरतीत ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी आपली मागणी आहे. शिक्षक नाहीत म्हणून जिल्हा परिषद शाळेतील मूल शहरात येत आहेत.
गाव बंद पडत चालली असून भारतीत प्राधान्य दिल्यास ही परिस्थिती बदलणार आहे. यासाठी शिक्षणमंत्री, पालकमंत्री, आमदारांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजपचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. जठार म्हणाले, याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसेंच लक्ष वेधले असून सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांसह येथील आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. शिक्षक भरतीमध्ये आमच्या मुलांना प्राधान्य दिले जावे यासाठी लक्ष वेधणार आहोत.
पेसा कायद्यानुसार आदिवासी भागातील लोकांना भरती प्रक्रियेत पहिलं प्राधान्य दिलं गेल. पवित्र पोर्टलमुळे महाराष्ट्र म्हणून भरती होत असून डोंगरी भाग असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी सिंधुरत्न योजना आणली गेली. दर १० किलोमीटरवर इथली बोली भाषा बदलते.
आपल्या लोकांना रोजगार नाही म्हणून स्थानिक बाहेर जात आहेत. या दोन जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत एक लाख मुलं शिकत आहेत. फॅक्टरी, उद्योग आणण्यासाठी प्रयत्न आहेच. पण, आमची मुल जिल्ह्यात राहून जिल्हा परिषद शाळांत गेल्यानंतर निर्माण होणारा रोजगार शिक्षकाच्या माध्यमातून आपल्या हवा आहे. आमच्या ८० टक्के मुलांना रोजगार द्यावा. महसूल, आरोग्यासह इतरही विभागात आमच्या लोकांमुळे निर्माण होणारी पद आमच्या ८० टक्के लोकांना द्यावी. रोजगाराला कालमर्यादा असते. आज गावागावातील लोक ही बाहेरील असून शिक्षक नाहीत म्हणून शहरात येत आहेत. यामुळे गाव बंद पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर गेल्या महिनाभर सर्व जिल्ह्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सेवा अभियान राबविण्यात उपक्रम हाती घेतला असून चांगला प्रतिसाद कोकण विभागात मिळत आहे. केंद्र व राज्यासह सर्व ठिकाणचे सरकार सोल्युशन देणारे हवे यासाठी हा पुढाकार आहे. सर्वांना मंत्रालय, जिल्हाधिकारी यांच्याकडे जाता येतं नाही. त्यांना न्याय दिला जाईल, विकास निधीबरोबर वीज पाणी रस्ते आदींचे प्रश्न आजच्या सेवा अभियानात आले आहेत.
महाराष्ट्रात या अभियानाअंतर्गत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ओएसडी संतोष साखरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात दौरा केला जात आहे. पाठपुरावा करताना केवळ गाऱ्हाणी घेणे नव्हे तर त्याचा पाठपुरावा करून त्या सोडविल्या जाणार आहे. सत्ता आल्यानंतर सारेच सत्तेत धुंद असतात. सामान्य जनतेकडे पहायला वेळ नसतो. परंतु, आता जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
आजच्या अभियानात ३५० प्रश्न आले आहेत. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेकडून हे प्रश्न व समस्या आल्या आहेत.समस्या कधी संपत नाहीत. मात्र, सरकार आमचे ऐकून घेते यामुळे जनतेत समाधानाची भावना असते. आजच्या निवेदनाच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष मंत्र्यांना सुचना करतील. भाजपात अध्यक्षाला महत्त्व असल्याने तात्काळ त्यावर कार्यवाही केली जाईल. येणाऱ्या काळात इतर दोन्ही विधानसभा मतदारसंघात देखील हे अभियान होणार आहे.
दरम्यान, पुणे येथे राहूल गांधी यांनी मनुस्मृती महिलांना मोकळीक देत नाही असा आरोप केला. मनूस्मृती ही पूर्वी झाली असून येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर यांचा आधी गौतम बुद्ध यांचा जन्म, हडाप्पा संस्कृतीसह पुरातन काळापासून चालत आलेली आहे. साडेतीन हजार वर्षांपूर्वी लिहिलेली मनूस्मृती आहे. त्यात अनेक बदल केलेत.
चुकीच्या गोष्टी काढल्या गेल्यात. पण, राहूल गांधी आणि कॉग्रेसचे नेत्यांना मनुस्मृतीवर राग आहे. पण, बायबल,कुराणावर ते कधी बोलणार ? त्यांच्याही धर्मात अनेक कुप्रथा आहे. यावर बोलण्याची हिंमत राहुल गांधी किंवा कॉग्रेस करणार का ? असा सवाल त्यांनी केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, महेश सारंग, संदिप गावडे, सुधीर आडीवरेकर, प्रसन्न देसाई, रविंद्र मडगावकर, मधू देसाई, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते










