
कणकवली : महायुती सरकारच्या निर्णयांचा कोकणातील शेतकर्यांनाही फायदा झाला आहे. कोकणातील नियमीत कर्जभरणा करणार्या शेतकर्यांसाठी ५० हजारांचा प्रोत्साहनपर निधी महायुती सरकारने जाहीर केला. सरकारची अद्याप साडेतीन वर्षे शिल्लक आहेत. यापुढेही अनेक महत्वाकांक्षी निर्णय महायुती सरकारतर्फे घेतले जाणार आहेत. ही पाच वर्षे शेतकर्यांसाठी अतिशय महत्वाची ठरतील. देवाभाऊच्या सरकारनेच आम्हाला आधार दिला, असे शेतकरी यापुढे सांगतील असा विश्वास पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री राणे प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, शेतकरी विमा रकमेचे वितरणही सुरु झाले आहे. सिंधुदुर्गात फोंडाघाट, देवगड, पडेल आदी विभाग विमा वितरणातून तांत्रिक कारणास्तव वगळले आहेत. मात्र, याबाबत माझा पाठपुरावा सुरु असून संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी आपले बोलणे झाल्याचेही राणे म्हणाले. मासेमारीला शेतीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्यांप्रमाणे मच्छिमारांनाही कर्जमाफी, वीजबिल माफी मिळावी, यासाठी त्या खात्याचा मंत्री म्हणून मी प्रयत्नशील असल्याचेही राणेंनी सांगितले.











