LIVE UPDATES

कृषी दिनानिमित्त आंबडपालात शेतकरी मेळावा

हवामान बदल, आधुनिक शेती अन् तज्ज्ञांचे मार्गदर्शन; कृषी दिनी शेतकऱ्यांसाठी पर्वणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 29, 2026 20:53 PM
views 29  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता आंबडपाल (ता. कुडाळ) येथील भद्रकाली मंदिर शेजारील सभागृहात कृषी दिन २०२६ निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपाध्यक्ष दादा साईल यांनी दिली.

       या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत राहणार असून, लोकसभा सदस्य नारायण राणे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रमोद जठार, अनिकेत तटकरे तसेच आमदार निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

        कार्यक्रमात उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील डॉ. विजय दळवी तसेच ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे येथील डॉ. यशवंत मुटाळ हे बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, त्यावरील उपाययोजना व आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांची मनोगते, मान्यवरांचे मार्गदर्शन, वृक्षारोपण आणि श्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले आहे.

      जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांनी केले आहे.