
सावंतवाडी : आंबोलीत रविवारी सर्पदंशाने पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पर्यटनासाठी आलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा सतिचीवाडी येथील चिरेखाणीत साचलेल्या खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. संजय लक्ष्मण गांवकर (वय ५०, रा. इन्सुली) असे मृत पावलेल्या पर्यटकाचे नाव आहे.
माजगाव उद्यमनगर येथील ‘हिंदुस्थान पॉलीमर्स’ या कंपनीत काम करणारे ११ जण माजगाव आणि इन्सुली परिसरातून आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सतिचीवाडी येथील चिरेखाणीच्या पाण्यात उतरल्यानंतर संजय गांवकर यांचा अंदाज चुकल्याने ते खोल पाण्यात बुडाले. सोबत असलेल्या सहकाऱ्यानी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर या घटनेची माहिती माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी तत्काळ रेस्क्यू टीम आणि आंबोली पोलीस दूरक्षेत्राला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली आणि सांगेली रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
रेस्क्यू टीमचे सदस्य अजित नार्वेकर यांनी प्रसंगावधानाने खोल पाण्यात उतरून संजय गांवकर यांना बाहेर काढल. त्यानंतर पोटातील पाणी काढून तसेच सीपीआर देऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या बचाव कार्यात अजित नार्वेकर यांच्यासह राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, नारायण चव्हाण, दीपक मेस्त्री, सुजीत नायर, प्रथमेश गावडे, कमलेश गावडे, गिरीश गावडे आणि विराज गावडे यांनी महत्त्वाची मदत केली. घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.













