LIVE UPDATES

‘शुगर’ने वाढविला गृहिणींचा ‘बीपी!’

ऐन सणासुदीत बाजारात दरवाढीचा तडका : नवीन साखरेचा दर ७० रुपये किलोपेक्षा अधिक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 21, 2026 14:14 PM
views 117  views

कणकवली : सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच किरकोळ बाजारात साखर आणि गुळाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे. गेल्या आठ ते पंधरा दिवसांत साखरेच्या दरात किलोमागे तब्बल १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

आठ दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात जुन्या साखरेचा दर साधारण ५० ते ५५ रुपये किलो होता. आता हाच दर ६८ ते ७० रुपयांपर्यंत पोहोचला असून, नवीन साखरेचा दर ७० रुपये किलोपेक्षा अधिक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

साखरेसोबतच गुळाच्या दरातही वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वी ५० ते ५५ रुपये किलो असलेला गूळ आता सुमारे ६५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय खाद्यतेल आणि तांदळाच्या दरातही वाढ झाल्याचे किरकोळ विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात घराघरांत मिठाई, मोदक, लाडू, चिवडा आणि विविध गोड पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे या काळात साखर आणि गुळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशातच दरवाढ झाल्याने गृहिणींच्या स्वयंपाकघरातील खर्चाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशभरात साखरेच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. सणासुदीच्या काळातील वाढती मागणी आणि देशांतर्गत पुरवठ्यावरील दबाव कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सणासुदीच्या खर्चात आणखी भर
आधीच खाद्यतेल, तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या खर्चामुळे गृहिणींचे घरगुती बजेट ताणले गेले आहे. त्यात आता साखर आणि गुळाच्या दरवाढीची भर पडल्याने सणासुदीचा गोडवा महागणार असल्याची भावना ग्राहकांमधून व्यक्त होत आहे. दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने बाजारभावावर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.