
कोकणसाद LIVE च्या कृषी संवाद कार्यक्रमाचे होते ब्रँड अँबेसिडर
मुंबई : कृषी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आज मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप गावचे प्रगतशील शेतकरी शरद गणपत धुरी यांना राज्यातील सर्वोच्च मानाच्या ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने’ राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या अभिमानास्पद कामगिरीमुळे झाराप गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग LIVE अर्थात आताच्या कोकणसाद LIVE च्या कृषी संवाद कार्यक्रमाचे ते ब्रँड अँबेसिडर होते.
कृषी क्षेत्रात सातत्याने केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत शेतीचा प्रसार तसेच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेले कार्य याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठी शरद गणपत धुरी यांची ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली होती. कृषी दिनानिमित्त मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे झालेल्या भव्य सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन शरद धुरी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रेय विठोबा भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शरद धुरी यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत उत्पादनवाढ, नाविन्यपूर्ण शेती पद्धती, फळबाग लागवड, पर्यावरणपूरक शेती आणि शेतकरी मार्गदर्शन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्यातील सर्वोच्च कृषी सन्मानाने गौरविले आहे.
झाराप गावातील एका शेतकऱ्याला राज्यस्तरीय सर्वोच्च कृषी पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी फटाके फोडून व एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष साजरा केला. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून शरद धुरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यापूर्वी सिंधुदुर्ग LIVE अर्थात आताच्या कोकणसाद LIVE च्या कृषी संवाद कार्यक्रमाचे ते ब्रँड अँबेसिडर होते. या पुरस्कारामुळे झाराप गावाचे नाव राज्याच्या कृषी क्षेत्रात अभिमानाने झळकले असून, शरद धुरी यांचे यश हे केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याच्या भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत. त्यांच्या कार्यातून नव्या पिढीतील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार असून, आधुनिक आणि शाश्वत शेतीचा आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.














