
वाडा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील घोणसई गावातील मुख्य रस्त्यावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून गावाचा बाहेरील संपर्क तुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून घोणसई गावातील मुख्य ओहोळावरील पूल जलमय झाला आहे. यामुळे कामानिमित्त गावाबाहेर गेलेले अनेक नागरिक गावात परतू शकत नसल्याने बाहेरच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांनाही अत्यावश्यक कामासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत गावाबाहेर जाता येत नसल्याने गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या मार्गाला पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय अधिकच वाढली आहे. अवघ्या काही दिवसांच्या पावसात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.















