शिंदेशाहीची वर्षपूर्ती !

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 11:14 AM
views 138  views

सिंधुदुर्ग : 20 जून 2022 चा तो निकाल अन् उद्धव ठाकरेंच महाविकास आघाडीच धोक्यात आलेल सरकार. विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. कोण निवडून जाईल ? याची सर्वांनाच उत्सुकता होती. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आल्यानं पक्षात उत्साहाचे वातावरण होते. निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते 'वर्षा' बंगल्यावर जमले होते. त्याचवेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे काही आमदारांसह 'नॉट रिचेबल' असल्यास वृत्त प्रसिद्ध झाले. शिंदे बंड करून सूरतला पोहोचले आणि पुढच्या दहा दिवसांत राज्याचं राजकारणच ढवळून निघालं. ३० जून २०२२ ला धर्मवीर आनंद दिघेंचे शिष्य एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचे 40 वे मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. आज या शिंदेशाहीला एक वर्ष पूर्ण होत आहे.


20 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीनंतर लगेचच एकनाथ शिंदे गायब झाले. ते 'नॉट रिचेबल' होते. काही वेळाने कळले की, शिंदे शिवसेनेच्या इतर 11 आमदारांसह भाजपशासित गुजरातच्या सूरत शहरात आहेत. दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली. मात्र त्या बैठकीला एकनाथ शिंदेसह तब्बल 10-12 आमदारांनी गैरहजेरी लावली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या व्हीप पदावरून हकालपट्टी केली. शिवसेनेनं त्यांचे आणखी आमदार शिंदेंसोबत जाऊ नये म्हणून त्यांना मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अपील केली. शिंदेनी ठाकरेंना 'अनैसर्गिक' महाविकास आघाडी तोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास सांगितले. शिंदे यांनी दावा केला की त्यांना 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. कायद्यानुसार, शिंदे यांना 37 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. एकूण 55 च्या दोन तृतीयांश संख्याबळ, नाहीतर त्यांना पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरवले गेले असते.


22 जून रोजी, एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपशासित आसाममधील गुवाहाटीला गेले. त्याच दिवशी, संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी घोषणा केली की, ते आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास तयार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' निवासस्थान सोडत मातोश्रीवर आले‌. 23 जून रोजी 37 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित केले. 24 जून रोजी शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली आणि विधानसभेतील उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्याकडे शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. त्यानंतर भाजपला पाठिंबा देणाऱ्या दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. यावर बंडखोरी केलेल्या 34 आमदारांची स्वाक्षरी होती. मात्र, झिरवाळ यांनी हा ठराव फेटाळला. कारण आमदारांनी याचिका स्वत: न पाठवता एका निनावी इमेलने पाठवली होती.


त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुजरातमधील वडोदरा येथे भेट घेतली. 26 जून रोजी शिंदे उपसभापतींनी विश्वासदर्शन ठराव अर्ज नाकारल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना 'शिवसेना नेता' पदावरून हटवले. शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर 10 दिवसांतच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 40 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आज शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात अनेक विकासात्मक व धाडसी निर्णय शिंदेकडून घेण्यात आलेत. पऱंतु, सगळ्यांच लक्ष लागून राहिलेला दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. शिंदेशाहीच्या वर्षपूर्ती निमित्त तो होईल अशी चर्चा राजकीय गोटात आहे.