
सावंतवाडी : गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाचा अंत ठरलेलाच, प्राणज्योत मालवल्यानंतर स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात. मात्र, या स्मशानभूमीत दिपावली सण साजरा केला जातो. ना नात्याचे ना गोत्याचे पण, या मृतात्म्यांचे स्मरण करणारा एक अवलिया म्हणजे 'मारुती'. गेली १२ वर्ष ते या स्मशानभूमीत सेवा बजावत आहेत. दिवाळीचे पाचही दिवस पणत्या लावून, आकाशदिव्यांसह स्मशानभूमीला विद्यूत रोषणाई करत ते स्मशानातही दिवाळी सण साजरा करतात. मृतात्म्यांचे स्मरण यानिमित्ताने त्यांच्याकडून केलं जातं.
सावंतवाडी नगरपरिषदच्या उपरलकर स्मशानभूमीत मारूती निरवडेकर गेली १२ वर्ष कार्यरत आहेत. अहोरात्र ते इथे सेवा देतात. मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असते. अग्नी देऊन नातेवाईक घरी गेल्यानंतर देखील मृतदेहाची राखण ते करतात. सारी भरण्यापासून ते दशक्रीया विधीपर्यंत त्यांची मदत दुःखात असलेल्या कुटुंबास होते. यात त्यांना त्यांची सौभाग्यवती सौ. निरवडेकर या देखील सहकार्य करतात. स्मशानभूमीची देखभाल राखणे, स्वच्छता करणे, परिसरातील झाडांची निगा राखणे आदी काम ते करतात.
दिवाळी निमित्त ते गेली १२ वर्ष स्मशानभूमीत आकाशदिवे, विद्युत रोषणाईसह दिवे लावतात. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीजेपर्यंत ते नेमाने हे काम करतात. मृत व्यक्तीच स्मरण मी यानिमित्ताने करतो, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून मी हे कार्य करतो असं श्री. निरवडेकर आवर्जून सांगतात. विशेष म्हणजे, कोरोना सारख्या महामारीत निर्बंधांमुळे रक्ताची माणसं मुखाग्नी देऊ शकत नव्हती. काहीजण तर ते धारिष्ट्यही दाखवत नव्हते. तेव्हा, हेच मारूती निरवडेकर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत होते. त्यांच्या या कार्यासाठी विविध सामाजिक संस्थांकडून देखील सन्मान करण्यात आला आहे.