LIVE UPDATES

रवींद्र चव्‍हाण भाजपचे नवे ‘कॅप्‍टन!’

सिंधुदुर्गच्‍या सुपूत्राचा उत्तुंग प्रवास..
Edited by:
Published on: July 02, 2025 11:38 AM
views 40  views

समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केले पाहिजे असा सर्वसाधारण नियम आहे. पण या नियमाला अपवाद म्हणजे. रवींद्र चव्हाण अर्थात रवी दादा ! समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही. कारण ते दाखवण्यासाठी करण्यापेक्षा कर्तव्य म्हणून करायचं असतं आणि राजकारणात देश व पक्षनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची व "न्यूज सायकल" मध्ये न अडकता आपल्यावर सोपवलेली जबाबदारी कर्तव्यकठोरपणे पार पाडायची, हाच रवी दादांचा नेहमीचा खाक्या आहे. आज भाजपच्‍या सर्वात मोठ्या मानाच्‍या पदासाठी एका सिंधुपुत्राची निवड झाली. कोकणच्‍या इतिहासात प्रथमच इतक्‍या मोठ्या पदाला गवसणी घालणारे रवींद्र चव्‍हाण, एकमेव आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार रवींद्र चव्हाण यांच्या मनावर बिंबले आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हा ‘रवी’ नावाचा ‘दादा’माणूस उदयाला आला. भाजप प्रदेशाध्‍यक्ष पदाची माळ त्‍यांच्‍या गळ्यात पडली, यामागे त्‍यांचे अपार कष्‍ट, पक्षनिष्‍ठा, संघर्ष आणि असामान्‍य कर्तृत्‍व नक्‍कीच आहे. 


सिंधुदुर्गचे सुपूत्र आणि भाजप पक्षाशी आणि तत्‍वांशी सदैव एकनिष्‍ठ असलेले, स्‍वत:च्‍या कार्याचा कोणताही गवगवा न करता अखंड मेहनतीने जनमानसात वेगळे स्‍थान मिळविणारे रवींद्र चव्‍हाण यांच्‍या भाजपच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदी निवड झाली, ही समस्‍त कोकणवासियांसाठी अभिमानास्‍पद बाब आहे. प्रथमच एका राष्‍ट्रीय बलाढ्य पक्षात एवढे मोठे पद मिळविणारे रवी दादा हे एकमेव ठरले आहेत. ‘संघटन’ ही त्‍यांच्‍या कार्याची पोचपावती आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांत मिसळून बूथस्‍तरीय पक्षीय संघटना वाढविण्‍यावर त्‍यांनी नेहमी भर दिला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री असतानाही अनेक प्रकल्‍प आणि विकासाभिमुख उपक्रम त्‍यांनी राबविले. वरिष्‍ठ नेत्‍यांची मर्जी राखतानाच कनिष्‍ठ कार्यकर्ता दुरावता नये, ही भूमिका त्‍यांनी प्रथमपासूनच मांडली. त्‍यामुळेच आज त्‍यांच्‍या कार्याचा गौरव प्रदेशाध्‍यक्षाची माळ गळ्यात घालून भारतीय जनता पार्टीने केला आहे. त्‍यामुळे भविष्‍यात जिल्‍ह्यातील भाजपला अधिक बळकटी मिळेल, हे नक्‍की. 

दादांनी मिळविले तळागाळातील लोकांचे प्रेम...
युवा पिढी, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांशी संवाद साधण्याचे विलक्षण कसब आणि त्यातून कमावलेला दांडगा जनसंपर्क, तसेच देशहित, जनसेवा आणि पक्षनिष्ठा यासाठी अथक मेहनत हीच रवींद्र चव्हाण यांची कार्यशैली आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे डोंबिवली सारख्या सांस्कृतिक शहराचे प्रतिनिधित्व करत असताना गेली १६ वर्षे ‘डोंबिवलीकर’ मासिकाचे संपादक पद रवी दादांनी भूषवले. संपूर्णतः अराजकीय स्वरुपाचे ‘डोंबिवलीकर’ मासिक म्हणजे कला, क्रीडा, साहित्य, संस्कृतीला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक म्हणून प्रसिद्ध आहे. डोंबिवली शहर हे घर आणि डोंबिवलीकर हा परिवार’ या भावनेतून चव्हाण यांनी ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ उभारला आहे. डोंबिवलीकरांमधल्या कलागुण आणि क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी डोंबिवलीकर सुपर सिंगर पुरस्कार’, ‘डोंबिवलीकर सुपर डान्सर पुरस्कार’ असे गुणगौरव सोहळे, तसंच ‘डोंबिवलीकर मासिक’, ‘डोंबिवलीकर दिनदर्शिका’, ‘डोंबिवलीकर स्टुडिओ’ असे विविध उपक्रम रविंद्र चव्हाण राबवतात. प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीकरांचा गेली १५ वर्षे ‘आदर्श डोंबिवलीकर पुरस्कारा’ने गौरव करण्यात येतो. रवींद्र चव्हाण यांच्या दूरदर्शी आणि व्यापक नेतृत्वामुळेच ‘डोंबिवलीकर’ हा जगाच्या पाठीवर एक ब्रँड म्हणून उदयाला आला आहे.

सिंधुदुर्गातील कातकरी समाजासाठी कार्य
राजकारणात सहसा बघायला न मिळणारा हळवेपणा ही रविंद्र चव्हाण यांची खासियत... त्यांच्याकडे आलेला प्रत्येकजण समाधानी वृत्तीनेच परत जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी कुटुंबांचा घराच्या जागेचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवायला काही टेक्निकल अडचणी होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता दरबारात ज्यावेळी ही गोष्ट रवींद्र चव्हाण यांना कळली, तेव्हा त्यांनी पुढचा मागचा विचार न करता स्वतःच्या मालकीची जमीन त्या कातकरी कुटुंबियांना दान केली.

काश्मीरमध्‍ये महाराष्‍ट्र भवन.... 
काश्मीर सफरीवर जाणाऱ्या पर्यटकांच्या मोफत निवास सुविधेसाठी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय रवींद्र चव्हाण यांनी घेतला. चव्हाण यांच्या कार्यकाळातच या भवनासाठी जम्मू - काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम येथे जवळपास १०,११७ चौ. मी. जमीन खरेदी करण्यात आली, तसंच यासाठी ९ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद देखील करण्यात आली.

संघटन कौशल्‍याची झलक...
कामगार वर्गाच्या आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवत, त्यांचा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी जिंकला आहे. म्हणूनच इंडिगो एअरलाईन्सचे २ हजारांहून अधिक कर्मचारी आणि तब्बल २९ हजारांहून अधिक माथाडी कामगारांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. काँग्रेसचे माजी आमदार संग्रामजी थोपटे, शेकापचे माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांसारख्या राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रवी दादांच्या नेतृत्वात भाजपा परिवारात प्रवेश केला.

एका दिवसात अष्‍टविनायक यात्रा! 
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थयात्रा असणारी अष्टविनायक यात्रा केवळ १ दिवसात करणं मंत्री चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांनी शक्य झालं आहे. यासोबतच महाबळेश्वर तालुक्यातील श्री उत्तेश्वर मंदिर, कार्ल्याचं श्री एकविरा आई मंदिर, खिद्रापूर येथील श्री कोपेश्वर मंदिर अशा अनेक मंदिरांचं जतन, संवर्धन आणि परिसर विकास करण्याचं काम त्यांनी केलं आहे.

दादांचे असेही सावरकर प्रेम...! 

रवींद्र चव्हाण कट्टर सावरकरभक्त आहेत. मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा स्थापन करण्यास मोलाचे सहकार्य केले. २०२३ साली या पुतळ्याचे अनावरण मॉरिशसच्या राष्ट्रपतींच्या हस्ते आणि रविदादांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. तसेच गेली ११ वर्षे डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड ज्योत प्रज्वलित आहे.


एक नजर २५ वर्षांच्‍या यशस्‍वी कारकिर्दीवर....

    • २००२ साली भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
    • २००५ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून विजयी
    • २००७ साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदावर विराजमान
    • २००९ साली नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून दणदणीत विजय
    • २००९ नंतर २०१४, २०१९ आणि २०२४ असा डोंबिवलीच्या आमदारकीचा विजयी चौकार
    • २०१६ साली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी; तसेच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
    • २०१६ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या ४ खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी
    •  २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार
    • २०२० साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक
    • २०२२ शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या २ खात्यांचा कारभार, तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर या २ जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
    • २०२५ भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा आणि त्‍यानंतर महाराष्‍ट्र प्रदेशाध्‍यक्षपदी निवड

    काही क्रांतिकारी निर्णय...

    • अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीत ‘आनंदाचा शिधा’, ‘रेशन आपल्या दारी’ सारखे महत्त्वाचे उपक्रम
    • सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहताना महाराष्ट्रात पायाभूत सेवा-सुविधांची क्रांती
    • मुंबई गोवा हायवेशी निगडीत केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी, बाधित क्षेत्रातील संबंधित भूधारक, वित्तीय संस्था, कंत्राटदार यांच्याशी समन्वय साधून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या महामार्गाचे सर्वाधिक टप्पे विकसित करण्याचे मोठे कार्य
    • स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जवळपास ९२ हजार कोटींची रस्ते आणि पुलांची कामे करण्याची किमया त्‍यांनी घडवली. या काळात २३ हजार ८८६ किमी लांबीचे रस्ते आणि १ हजार ०५४ पूलांचे बांधकाम पूर्ण झाले असून २९ हजार ०४१ किमी लांबीचे रस्ते आणि १ हजार ७९७ पूलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहेत.
    • ३४ हजार कोटी रक्कमेच्या शासकीय इमारतींचे बांधकाम आणि नूतनीकरण, यात प्रामुख्याने न्यायालये, प्रशासकीय कार्यालये, शासकीय विश्रामगृहे इत्यादीचा समावेश.
    • रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, विमानतळ यांसारख्या २२ पायाभूत सुविधांच्या उभारणी आणि देखभालीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) स्थापन 
    • कोकण रेल्वे मार्गावरील १२ प्रमुख रेल्वे स्थानक परिसरांना दिला विमानतळाचा लुक
    • श्रीराम जन्मभूमी दर्शनासाठी महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी शरयू नदीजवळ अंदाजे ९,५०० चौ.मी. क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या १२ मजली अयोध्या महाराष्ट्र भक्त निवासाचे जमीन अधिग्रहण आणि भूमिपूजन
    • रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात संघटन पर्व अभियानाच्या माध्यमातून जवळपास दीड लाख सक्रिय सदस्य आणि तब्बल दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीच्या ऐतिहासिक कामगिरीची नोंद