
सावंतवाडी : सध्या कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावी दाखल झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी तसेच विविध ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
या वाढलेल्या गर्दीचा परिणाम मळेवाड जंक्शन परिसरातील वाहतुकीवरही होत असून, येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात मळेवाड जंक्शन परिसरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे.











