
वैभववाडी : तालुक्यातील करूळ गावठण ब येथील नदीत पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झालेल्या सदानंद हरिश्चंद्र कदम (वय ६५) यांच्या कुटुंबीयांची युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी कदम कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.
काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात सदानंद कदम हे वाहून गेले होते. या घटनेनंतर महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच सह्याद्री जीवरक्षक टीमच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या दुर्घटनेमुळे करूळ परिसरात शोककळा पसरली होती.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुशांत नाईक यांनी कदम यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या कठीण प्रसंगी युवासेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शासनाकडून मिळणारी सर्वतोपरी मदत आणि आवश्यक सहकार्य वेळेत मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.यावेळी युवासेना तालुकाप्रमुख नंदू शिंदे, लक्ष्मण रावराणे, यशवंत गवाणकर आणि सुभाष कदम उपस्थित होते.











