
कणकवली : गणेश चतुर्थीच्या तोंडावर राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. बँकांचे नियमित कामकाज ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
गावखेड्यातील नागरिक विविध बँकिंग कामांसाठी बँकांमध्ये येत आहेत. मात्र कर्मचारी संपावर असल्याने कामकाज होत नसल्याने ग्राहकांना बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने शुक्रवार संप शनिवार सेकंड सॅटर्डे, रविवार सुट्टी सोमवार गणेश चतुर्थी सुट्टी असे चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहार, पैसे काढणे, जमा करणे तसेच इतर बँकिंग कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी जिल्हाभरात संपात सहभागी झाल्याने त्याचा परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवरही जाणवत आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत असताना बँकिंग सेवा विस्कळीत झाल्याने व्यापारी, शेतकरी, नोकरदार आणि सर्वसामान्य ग्राहकांची गैरसोय होत आहे.
दरम्यान, पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, तसेच Performance Linked Incentive (PLI) योजनेमध्ये बँक व्यवस्थापन आणि कर्मचारी-अधिकारी यांच्यात असलेली मोठी तफावत दूर करावी, यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आल्याचे कर्मचारी संघटनांकडून सांगण्यात आले आहे.
एकीकडे कर्मचाऱ्यांचा आपल्या मागण्यांसाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे चतुर्थीच्या तोंडावर बँकिंग सेवा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य ग्राहक मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










