
कणकवली : आम.नितेश राणे आणि नारायण राणे यांनी काम केलं हे जनता जाणते आहे.कोकणाला चांगल्या कर्तबगार खासदार आमदारांची गरज आहे. सिंधुदुर्गातील जनतेने मला सहा वेळा विधानसभेत निवडून दिले म्हणून मी मुख्यमंत्री झालो. मी पहिल्यांदा आमदार होण्याआधी सिंधुदुर्गात रस्ते, पाणी, वीजची अपुरी सुविधा होती. महिलांना रोजगाराचे साधन नव्हते. आज जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 2 लाखाच्या वर आहे.गेली ३४ वर्षे मला वेगवेगळी पदे मला मिळाली आहेत,तुम्ही मला १९९० मध्ये आमदार केलं त्यामुळे अनेक पदांवर काम केले आहे.१९९० अगोदर जिल्हा कसा होता? तरुणांनी माहिती घ्यावी,दरडोई उत्पन्न ३५ हजार होते,आता २ लाख ४० हजार झालं हे कोणी केलं? २०२५ पर्यंत ३ ते साडेतीन लाख रुपये दरडोई उत्पन्न होईल.
आज जिल्ह्यात हॉस्पिटल, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, दर्जेदार रस्ते, मुबलक वीज पाणी पुरवठा सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी राणे कुटुंब सदैव झटत असून आमचा धर्म माणुसकीचा असल्याचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी सांगितले.
कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघाची प्रचार सभा असलदे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ना.राणे बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, माजी जि प सदस्य संजय देसाई, पंढरी वायंगणकर, प्रकाश पारकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, उपतालुकाध्यक्ष पूजा जाधव, माजी पं स सभापती भाग्यलक्ष्मी साटम, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,ओटव सरपंच रुहिता तांबे, कासार्डे सरपंच निशा नकाशे, दारूम सरपंच तेजस्वी लिंगायत, तोंडवली - बावशी सरपंच मनाली गुरव, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, कोळोशी सरपंच आचरेकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना राणे यांनी विरोधी उमेदवार विनायक राऊत यांचाही समाचार घेतला.राऊत यांनी 10 वर्षे खासदारकी काळात एकही विकासकाम केले नाही. उद्या खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मी केंद्रात मंत्री असणार आहे. उद्योजक घडवण्यासाठी युवकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी 200 कोटींचे टेक्निकल ट्रेनिंग सेंटर ओरोस मध्ये उभारत आहे. दोडामार्ग कुडाळ आणि कणकवली सह वैभववाडी मध्ये 500 पेक्षा जास्त कारखाने आणणार आहे. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या उपकरणांचे कारखाने दोडामार्ग ला उभारणार आहे. फळप्रक्रिया उद्योग आणणार आहोत. चिपी विमानतळाला विरोध करायला विनायक राऊत आघाडीवर होता. मात्र जेव्हा चिपी विमानतळ पूर्ण झाल्यानंतर उदघाटन करताना स्वागताला विनायक राऊत होते.राऊतांनी थोडीतरी लाज बाळगावी. सी वर्ल्डला विनायक राऊतनी विरोध केला. विजयदुर्गला 4 हजार कोटींचे आधुनिक बंदर होत असताना त्यालाही राऊतनी विरोध केला. 3 लाख कोटी गुंतवणूक असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प सुद्धा नको म्हणत राऊतनी विरोध केला.जैतापूरचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेनी काही उद्योजकांकडून कोट्यवधी रुपये घेत विरोध केला. कोकणात राऊतनी एकही प्रकल्प आणला नाही. भाजपा संविधान बदल करणार असा खोटा प्रचार केला जातोय. काँग्रेस राजवटीत 80 वेळा राज्य घटनेत बदल केला. अब की बार मोदी तडीपार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंची राणे यांनी हजेरी घेतली. तू केवढा आहेस? 5 खासदार तुझे. मोदींचे नाव घेताना लाज वाटत नाही ? उद्धव ठाकरे अविचारी बोलतात. हिंदुत्व सोडून स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले. कोव्हीड काळात टेंडर मध्ये 15 टक्के कमिशन ठाकरेंनी घेतले. दिशा सालियान वर अत्याचार करून तिला ठार मारले. या सगळ्याची चौकशी सुरू असून लवकरच हे गजाआड असतील . कोकण विकासाला विरोध करणाऱ्या उबाठा शिवसेनेचे दुकान कायमचे बंद करा असे आवाहन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले.
अबकी बार मोदी तडीपार उद्धव ठाकरे म्हणतात,तुम्ही योगायोगाने मुख्यमंत्री झालात.उद्धव ठाकरे तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली.उद्धव ठाकरे केजरीवालच्या पंगतीला केव्हा जातील,हे सांगता येत नाही.मी ३९ वर्षे मी शिवसेनेत होतो,मी उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेना सोडली.मी जो काय आहे तो ठाकरे यांच्यामुळेच असेही ना.राणे म्हणाले.