
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या प्रशासनाकडून शहरातील व उड्डाणपुलाखालील जागेतील अतिक्रमणे हटविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला ब्रेक लागलेला नाही. कणकवली स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रशासनाकडून प्लान तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहर स्वच्छ व सुंदर बनविले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पारकर म्हणाले, कणकवली शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनाने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नियंत्रणाखाली हटाव मोहीम पथक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील अतिक्रमण हटवले जात आहे. उड्डाणपुलाखालील जागेत तात्पुरत्या स्वरुपात फळ, फुले, भाजी विक्रेत्यांना बसण्याची मुभा देण्यात आली. या जागेत स्टॉल, टपर्यांसह कोणत्याही विक्रेत्यांना याठिकाणी बसण्याची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे रविवारपर्यंत स्टॉल, टपर्यांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वत:हून अतिक्रमणे हटवावी, अन्यथा प्रशासन कारवाई करेल, असा इशारा पारकर यांनी दिला आहे. व्यापार करण्यासाठी येणार्या विक्रेत्यांना नगरपंचायतीच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन नियोजन करीत आहोत, असे पारकर यांनी स्पष्ट केले.












