
देवगड | प्रतिनिधी
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाला भेट देत श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष महेश इंगळे यांनी त्यांचे श्री स्वामी समर्थांचा कृपावस्त्र, प्रसाद व स्वामींची प्रतिमा देऊन स्वागत व सत्कार केला.दर्शनानंतर बोलताना उदय सामंत म्हणाले की, राज्यातील उद्योग, व्यापार आणि रोजगारवाढीसाठी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केली असून, राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे आशीर्वाद लाभावेत, अशी भावना व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, अक्कलकोट ही केवळ धार्मिक नगरी नसून श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रेरणास्थान आहे. येथील सकारात्मक ऊर्जा राज्याच्या औद्योगिक विकासालाही नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, नगरसेवक अमोल शिंदे, शिवसेना नेते मनीष काळजे, संतोष पाटील, प्रवीण तानवडे, रविना राठोड, महेश साठे, मंदिर समितीचे सचिव आताराम घाटे, विश्वस्त महेश गोगी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.










