LIVE UPDATES

अन्न सुरक्षा कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांनी व्यवसाय करावा

नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले : 'अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र वितरण' कार्यक्रमाचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 24, 2026 20:32 PM
views 26  views

सावंतवाडी : अन्न सुरक्षा कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांनी व्यवसाय व व्यापार केला पाहिजे. हे आपल्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. आम्ही राजवाड्याच्या एका भागात हॉटेल्स व लॉजिंग व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या कायद्याचे रीतसर प्रशिक्षण घेतले असून नियमांचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करत आहोत असे प्रतिपादन नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले यांनी येथे केले. तसेच व्यापारी व व्यावसायिकांना नगरपरिषदेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र वितरण' कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस राजू जठार, माजी जिल्हाध्यक्ष नितीन वाळके, तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, नगरसेवक व व्यापारी संघटक आनंद नेवगी, व्यापारी संघटनेचे पुंडलिक दळवी, सीमा मठकर, महिला शहराध्यक्षा  सुजाता परब, अभय सातार्डेकर, श्री. नार्वेकर यांच्यासह मान्यवर व्यावसायिक उपस्थित होते.

नगराध्यक्षा सौ. सावंत-भोसले पुढे म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय उत्तम स्थितीत असून या ठिकाणी अत्यंत रुचकर अन्नपदार्थ मिळतात. मात्र, फूड सेफ्टी नियमावलीच्या अंमलबजावणीत अजूनही सुधारणेला वाव आहे. सिंधुदुर्ग व सावंतवाडी हे सुंदर आणि स्वच्छ भाग असल्याने भविष्यात व्यापार व पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे सर्वांनी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करून आरोग्यसंपन्न जीवनासाठी सहकार्य करावे.

जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन वाळके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अन्न सुरक्षा कायदा पूर्वीपासून लागू असला तरी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्याची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती सुरू केली आहे. कायद्याचे अज्ञान हा बचावाचा आधार ठरू शकत नाही, त्यामुळे खाद्यपदार्थांशी निगडित व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याने या नियमांचे काटेकोर पालन करावे. व्यापारी संघटना सदैव व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.

जिल्हा सरचिटणीस राजू जठार यांनी अन्न सुरक्षेबाबतच्या प्रत्यक्ष नियमांची माहिती दिली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी डोक्यावर कॅप व हातात हातमोजे घालणे अनिवार्य आहे. कढईतील वापरलेले तेल जास्तीत जास्त दोनवेळाच वापरावे. ते उरलेले तेल साठवून ठेवल्यास त्याला योग्य दर मिळवून देण्याबाबत तोडगा काढला जात आहे. याशिवाय, केमिकल प्रिंट असलेल्या रद्दी कागदावर वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ देणे पूर्णपणे बंद करून पर्यायी कागदाचा वापर करावा. हॉटेल परिसरात धुम्रपान किंवा मद्यपान आढळल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच हॉटेल मालकांना कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे लागेल, असे अन्न प्रशासनाच्या उपायुक्तांशी झालेल्या चर्चेच्या आधारे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले. सर्व व्यापारी व व्यावसायिकांना अन्न सुरक्षा कायद्याची योग्य माहिती मिळावी यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी व्यापारी संघटनेचे पुंडलिक दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.