
वैभववाडी : तालुक्यातील आचिर्णे येथे तुटलेल्या वीजवाहिनीचा धक्का लागून आठ शेळ्यांचा मृत्यू झाला, तर बारा शेळ्या गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत शेळीपालक शेतकरी बाबू शामू खरात यांनाही विजेचा धक्का बसून ते गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना आज दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर जखमी बाबू खरात यांना तातडीने उपचारासाठी ओरोस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तुटलेल्या वीजवाहिन्यांमुळे नागरिक व जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित यंत्रणेकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.










