
दोडामार्ग : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या वतीने विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासोबतच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी देशभक्ती, स्वातंत्र्यलढा, राष्ट्रध्वजाचे महत्त्व तसेच देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये याबाबत प्रभावीपणे विचार मांडले. या स्पर्धेत स्पृहा सुमित दळवी हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या सादरीकरणाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. सुयश नारायण गावकर याने द्वितीय क्रमांक, उर्वी परेश नाईक हिने तृतीय क्रमांक, तर निधी यशवंत गवस हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
रांगोळी स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विषयांना कलात्मक स्वरूप देत आकर्षक रांगोळ्या साकारल्या. या स्पर्धेत शुभ्रा जितेंद्र गवस व प्रिया प्रशांत गवस यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळविला. निधी यशवंत गवस व आर्या पदु ताटे यांनी द्वितीय क्रमांक, तर तीर्था अनिल मांगले हिने तृतीय क्रमांक पटकावला.
याचबरोबर शाळास्तरावर घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत दोडामार्ग इंग्लिश स्कूल, दोडामार्ग यांनी प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यार्थ्यांनी तिरंगा, भारतमाता, देशभक्तीपर संदेश तसेच स्वातंत्र्यदिनाशी संबंधित विविध संकल्पना रांगोळीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्या. या सर्व स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतनजी चव्हाण यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. विजेत्यांना शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांमध्येही उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संकेत गायकवाड, उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक-नगरसेविका, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










