LIVE UPDATES

सावंतवाडी तालुक्यातील २० विकास संस्थांचा १०० टक्के कर्ज वसुलीबद्दल गौरव

सचिवांच्या पगारासाठी बँक देणार दरवर्षी ९० लाख ; बिगर शेती कर्ज ७ दिवसांत : मनीष दळवी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 11, 2026 18:36 PM
views 72  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : विकास सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँकेने मागील पाच वर्षांत प्रत्येक संस्थेला दरवर्षी २० हजार रुपये व्यवस्थापन खर्च, सचिवांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स व उत्तम वसुलीसाठी बक्षीस योजना राबवली आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. तर सचिवांच्या पगारासाठी बँक दरवर्षी ९० लाख देणार असून  बिगर शेती कर्ज ७ दिवसांत दिलं जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सावंतवाडी येथील आयोजित ‘प्राथमिक विकास संस्था संवाद कार्यक्रम’त ते बोलत होते.

  अध्यक्ष श्री. दळवी म्हणाले, १४४ सचिवांच्या वेतन फरकाची रक्कम ९० लाखांपेक्षा जास्त आहे. संचालक मंडळाच्या मंजुरीने पुढील पाच वर्षे दरवर्षी ९० लाख रुपये बँक स्वतःच्या नफ्यातून सचिवांच्या पगारासाठी देणार आहे. यामुळे संस्थांना चांगल्या दर्जाची सेवा मिळून कारभार पारदर्शक व गतिमान होईल. शेती किंवा बिगर शेती कर्जासाठी सध्या ९० ते १०० दिवस लागतात. त्यामुळे शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांकडे जातो. यावर मार्ग काढण्यासाठी बँकेने नवीन प्रणाली सुरू केली आहे. यामुळे बिगर शेती कर्ज फक्त ७ दिवसांत मंजूर होणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. तर, नाबार्डच्या ४ टक्के व्याजदर योजनेत गोदाम बांधण्यासाठी ४० लाखांपर्यंत कर्ज मिळते. यातील १ टक्के व्याजही जिल्हा बँक भरणार असल्याने संस्थांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. जिल्ह्यात २२ पेक्षा जास्त संस्थांमध्ये बांधकाम सुरू आहे. पीक विमा योजनेत आंबा, काजू, भातासोबत सुपारी व नारळ पिकांचाही समावेश झाल्याचे त्यांनी सांगितले.

  यावेळी  ३० जून २०२६ अखेर बँकेच्या कर्जाची १०० टक्के वसुली करणाऱ्या २० विकास संस्थांचा अध्यक्ष मनीष दळवी व संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रविंद्र मडगांवकर, विद्याधर परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात आरोंदा, कोलगाव, स्थापेश्वर डेगवे, भावई क्षेत्रपाल कुणकेरी, आरोस, वाफोली (संस्था स्तरावरही १०० टक्के  वसुली), सातार्डा, वेत्ये, चराठे, देवसू, चौकुळ, मळेवाड, शिरशिंगे, वेर्ले, बांदा, इन्सुली, आजगांव, माडखोल, कारिवडे, माजगांव. याचा समावेश होता. १०० टक्केच्या जवळपास पोहोचलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचाही गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्ष दळवी यांनी विकास संस्थांनी कर्ज वाटप व वसुलीत आघाडीवर राहावे, असे आवाहनही केले. या कार्यक्रमास माजी संचालक गुरूनाथ पेडणेकर, मधुकर देसाई, गजानन सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, दत्ताराम गावडे, के. बी. वरक, वसंत हडकर, संजय डंबे, विलास धुरी, सौ. सोनाली चव्हाण, अमोल शिंदे तसेच संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अनिरुद्ध देसाई यांनी केले‌. तर सूत्रसंचालन अमोल शिंदे यांनी केले.