
सावंतवाडी : चौकुळ परिसरातील बाबा धबधब्याकडे होणाऱ्या पर्यटनामुळे गेल्या काही काळापासून स्थानिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या पर्यटनातून स्थानिकांना कोणताही कर मिळत नसतानाही वाहतूक, गर्दी आणि सुरक्षेचा प्रश्न मात्र स्थानिकांसमोर उभा राहत आहे.
दरम्यान, स्थानिकांनी सध्याची परिस्थिती स्पष्ट करत बाबा धबधबा काही दिवस बंद ठेवण्याची मागणी केली. स्थानिकांची भूमिका आणि निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन बाबा धबधब्याच्या मालकांनी काही दिवसांसाठी धबधबा बंद ठेवण्याचे मान्य केले.
यात वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेलेल्या केगदवाडीच्या पोलीस पाटलांवर हत्यार उचलण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त स्थानिकांनी ग्रामपंचायत बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केला. तसेच बाबा धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटनाच्या वाहनांना रोखून प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले. हा निर्णय केवळ एका ठिकाणच्या बंदचा विषय नसून स्थानिकांच्या सुरक्षिततेचा आहे. स्थानिकांना त्रास होत असेल सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले











