
वैभववाडी : नापणे येथे पेरणी केलेल्या भातपिकांची ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करून नुकसान केल्याप्रकरणी संशयित विजय गुरव यांच्यासह पाच जणांविरोधात वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रवीण देसाई यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, नापणे येथे त्यांच्या मालकीची ३४ गुंठे शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी भातपिकाची पेरणी केली होती. २० जुलै रोजी संशयित विजय गुरव व अन्य चौघांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने संपूर्ण शेतजमिनीची नांगरणी करून उगवलेले भातपीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेत वैभववाडी पोलिसांनी संशयित विजय गुरव यांच्यासह अन्य चार जणांविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.













