हल्लेखोरांना समुद्राच्या तळातून शोधून काढू !

ड्रोन हल्ल्यानंतर राजनाथ सिंह आक्रमक
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 26, 2023 17:01 PM
views 249  views

मुंबई : भारतात येणाऱ्या एका व्यावसायिक जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज मंगळवारी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकार हा हल्ला गांभीर्याने घेत आहे. ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना आम्ही समुद्राच्या तळातून शोधून काढू असे त्यांनी म्हटले आहे. 

मंगळवारी आयएनएस इम्फाळच्या कमिशनिंगदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आजकाल समुद्रातील खळबळ खूप वाढली आहे. भारताच्या वाढत्या आर्थिक आणि सामरिक सामर्थ्याने काही शक्ती ईर्ष्या आणि द्वेषाने भरल्या आहेत. अरबी समुद्रातील अलीकडील घटना भारताच्या ‘एमव्ही केम प्लूटो’वरील ड्रोन हल्ला आणि काही दिवसांपूर्वी लाल समुद्रातील ‘एमव्ही साई बाबा’वर झालेला हल्ला अत्यंत गांभीर्याने घेतला असल्याचेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, भारतीय नौदलाने समुद्रावर पाळत ठेवली आहे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना आम्ही समुद्राच्या तळातून शोधून काढू आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असाही इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे.

स्वदेशी बनावटीचे स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र नाशक INS इंफाळ मंगळवारी नौदल डॉकयार्ड, मुंबई येथे आयोजित समारंभात नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले. या सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. राजनाथ सिंह म्हणाले की, या युद्धनौकेला इम्फाळ असे नाव देण्यात आले आहे जे ईशान्येचे वैभव दर्शवते. INS इंफाळची निर्मिती भारतातील विविध शक्तींनी केली आहे.संपूर्ण हिंद महासागर क्षेत्रात (IOR) भारत नेट सुरक्षा प्रदात्याच्या भूमिकेत असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. या प्रदेशातील सागरी व्यापार महासागरापासून आकाशाच्या उंचीपर्यंत पोहोचेल याची आम्हाला खात्री आहे. यासाठी सागरी व्यापारासाठी सागरी मार्ग सुरक्षित आणि सुरक्षितच ठेवण्यासाठी आम्ही मित्र देशांसोबत काम करू. शनिवारी अरबी समुद्रात ‘एमव्ही केम प्लुटो’वर ड्रोन हल्ला झाल्याची घटना घडली होती. सौदी अरेबियातील बंदरातून हे जहाज भारतातील मंगळूर येथे येत होते. हा हल्ला गुजरातच्या वेरावळपासून 200 किलोमीटर अंतरावर करण्यात आला होता.