महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष | आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी

तूर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणार सुनावणी
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: February 21, 2023 10:25 AM
views 247  views

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टात तूर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. यात नबाम रेबिया प्रकरणानुसार पुढील सुनावणी व्हावी का, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं काल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीये. या याचिकेवर  तातडीने सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टासमोर केली. परंतु सरन्यायाधीशांनी याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार दिला आणि आज हे प्रकरण मेन्शन करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आज सत्तासंघर्षाची सुनावणी आधी होते की ठाकरेंच्या याचिकेवर कोर्ट आधी सुनावणी घेतं हे पाहावं लागणार आहे.  


निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान दिलं जाण्याची शक्यता गृहित धरून शिंदे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलंय. आमचं म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला केलीये.