
चिपळूण : श्रावण महिन्यात होणारा 'दहीहंडी' उत्सव आता केवळ एक पारंपरिक आणि सांस्कृतिक सण राहिलेला नाही, तर तो राजकीय शक्तीप्रदर्शनाचा आखाडा बनला आहे. लाखो रुपयांची बक्षिसे आणि राजकीय चढाओढ यांमुळे हंड्यांची उंची दरवर्षी वाढत आहे. मात्र, या जीवघेण्या स्पर्धेत दरवर्षी निष्पाप गोविंदांना आपला जीव गमवावा लागत आहे किंवा कायमचे अपंगत्व पत्करावे लागत आहे. त्यामुळे 'सण साजरा व्हावा, पण तो जीवघेणा नसावा. अशी भावना आता सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
भगवान श्रीकृष्ण आणि गोकुळवाशी यांचे एक अतूट नाते होते. कान्हाच्या बालपणी श्रीकृष्ण आपल्या संवगड्यांना घेऊन चोरून घरात उंचावर ठेवलेले माठातील दही दूध काढण्यासाठी एकावर एक चढून थर रचत आहे. आणि माठातील दही खात असे.
मात्र बदलत्या काळात याचे स्वरूप बदलले आणि आता उंचच उंच दहीहंड्या बांधल्या जातात. या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चढाओढ लागलेली असते. यातूनच काही दुर्घटना घडतात.
राजकीय नेत्यांची चढाओढ आणि बक्षिसांची खैरात
सध्याच्या काळात दहीहंडी उत्सवाचे स्वरूप पूर्णपणे व्यावसायिक आणि राजकीय झाले आहे. नेते लाखोंची रुपयांची बक्षिसे जाहीर करतात. या प्रतिष्ठेच्या लढाईत उत्सवाचे मूळ पावित्र्य हरवत चालले असून, गोविंदा पथके जास्तीत जास्त थर लावण्याचा प्रयत्न करतात.
गगनाला भिडणाऱ्या हंड्या आणि सुरक्षेचा अभाव यामुळे दरवर्षी काही गोविंदांना शारीरिक इजा ही होते. गोविंदा पथके ९ ते १० थरांचे मानवी मनोरे रचण्याचे धाडस करतात. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या उंचीवरून तोल गेल्यास गोविंदा थेट खाली आपटतात आणि गंभीर दुर्घटना घडतात.
दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी रुग्णालयांमध्ये जखमी गोविंदांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मान मोडणे, मणक्याला गंभीर दुखापत होऊन कायमचे अपंगत्व येणे किंवा उपचारादरम्यान मृत्यू होणे, या घटना आता दुर्दैवाने नित्याच्या झाल्या आहेत.
राजकीय नेत्यांच्या मंचावर डीजेच्या तालावर जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे एखाद्या गरीब घरातील तरुण कायमचा जायबंदी होतो.
या तरुणांच्या जीवावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. नेत्यांकडून दिली जाणारी काही लाखांची आर्थिक मदत गेलेला जीव किंवा शरीराचे गेलेले अवयव परत आणू शकत नाही. यासाठी गोविंदानी स्वतःचा जीव सांभाळून दहीहंडी फोडली पाहिजे. आपले कोणी तरी घरी वाट पाहत आहे याची जाणीव सदैव मनात ठेवली पाहिजे.














