LIVE UPDATES

अखेर उर्जामंत्री स्मार्ट मीटरवर बोलले

मीटरमुळे नव्हे हिटवेव्हमुळे बिलात वाढ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 10, 2026 21:09 PM
views 581  views

मुंबई : स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात अचानक वाढ झाल्याची तक्रार राज्यातील हजारो ग्राहकांनी केली आहे. तसंच स्मार्ट मीटरला विरोधही केला जात आहे. मात्र, स्मार्ट मीटरमुळे वीजबील वाढत नसून हिटवेव्हमुळे वाढल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणीवस बोलले. 


ते म्हणाले की, देशात स्मार्ट मीटर बंधनकारक करण्यात आला आहे. राज्यातही १ कोटी २३ लाख स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. हे प्रमाण ५० टक्क्यांच्या वर झाले आहे. तर आतापर्यंत ३ लाख ग्राहकांनी तक्रार दिली. तक्रारीनंतर दुसरं मीटर घेऊन जाऊन तपासणी केली. त्यात फक्त २१० तक्रारीत तथ्य आढळलं. म्हणजे .००१ टक्के इतकंच तक्रारीत तथ्य होतं. स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना दिवसाला वीजेची सवलत देण्यात आली आहे. तरीही काही लोकांकडून वीज बील जास्त आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. खरतंर हे वीजबील स्मार्ट मीटरमुळे नाही तर हिटवेव्हमुळे जास्त आलं आहे. यंदाच्या वर्षात ३ महिने हिट वेव्ह होती आणि उन्हाळ्यात वीज वापर २८ हजार मेगा वॅट ऐवजी जवळपास ३२ हजार मेगा वॅट इतका झाला. सलग तीन महिने ही वाढ दिसून आली असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज बील वापर आणि तापमान याबाबत बदलापुरात अभ्यास केल्याची माहितीही दिली. ते म्हणाले की, बदलापुरात मे २०२५मध्ये कमाल तापमान ३८ डिग्री होतं. तेच तापमान मे २०२६मध्ये ४३ डिग्रीवर पोहोचलं होतं. शिवाय पाऊसही एक महिना उशिराने आला. वीजेचा वापर वन बीएचकेमध्ये राहणाऱ्या कुटुंबात २७० युनिट असायचा तो ४१५ वर गेला. तर ४०० युनिट वापरणाऱ्यांचा यावेळी वापर ६०० वर गेला. वीज बिल आकारणीबाबत सांगताना फडणवीस म्हणाले की, ३०० युनिटच्या वर वापर गेला की दर ५ रुपयांनी वाढतो. तर ५०० च्या वर गेल्यावर आणखी दोन रुपये वाढतात. दर आकारणीची ही टेलिस्कोपिक पद्धत आहे आणि यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात वापर वाढल्यानं त्यांचं बील वाढलं. याचा स्मार्ट मीटरशी संबंध नाही. जिथं स्मार्ट मीटर लागलं नाही तिथंही असेच बील आले आहे. हिटवेव्हमुळे वीजेची मागणी वाढली आणि बिल जास्त आलं.

महाराष्ट्राने उन्हाळ्यात ३२ हजार मेगावॅटची मागणी पूर्ण केली. २ दिवस काही संच बंद पडले तेव्हा ५०० मेगावॅट कमी पडले. पण ग्रामीण भागात लोडशेडिंगची तक्रार आहे. पण तिथं लोकांना वीज मिळत नाही कारण फीडर सेपरेशन केलंय. अजूनही कृषी फीडरवर आहेत त्यांना अडचण होतेय असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.राज्यात ७६ टक्के कृषी फीडरना दिवसा वीज देतोय. त्यामुळे रात्री वीज बंद केली की त्यांना लोड शेडिंग वाटतं. त्यांना गावठाण फीडरवर नेण्याचं काम आपण करतोय. वसई विरारला ३ दिवस लाइट बंद ठेवली. पूरस्थितीमुळे लाइट ठेवाव्या लागल्या. लो लाइन एरिआयचं पावर इन्फ्रास्ट्रक्चर उंचावर ठेवण्याचं काम करायचं आहे. पूरपट्ट्यातही ते करतो आहोत अशी माहिती उर्जा मंत्री तथा मुख्यमंत्र्यांनी दिली.