BIG BREAKING | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता !

राष्ट्रवादीचे 20 आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: April 12, 2023 18:51 PM
views 581  views

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. सत्ताधारी शिवसेना भाजप विरोधी पक्षांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेनं एकनाथ शिंदेंच्या नेतृ्त्वात उद्धव ठाकरेंविरोधात यशस्वी बंड केल्यानंतर आता राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येतंय. जवळपास 20 आमदारांचा गट पक्षाविरोधात बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे या 20 आमदारांमध्ये कोण कोण आहे? याची चर्चा सुरू झाली आहे.दोन आठवड्यात या घडामोडी घडतील असं सरकारच्या निकटवर्तीय वर्तुळातून सांगितलं जातंय.


फुटणारे आमदार काँग्रेसचेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण राष्ट्रवादीचे आमदार फुटले तर त्यांचं नेतृत्व कुणाकडं असेल याचीही चर्चा सुरु आहे. सरकार कोसळल्यानंतर विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीत आमदारांची घुसमट सुरू झालीय. दुसरीकडे तपास यंत्रणांनी आमदारांच्या संस्था आणि सहकारी कारखान्यांची झाडाझडती सुरु केली आहे, त्यामुळे ही चर्चा फक्त चर्चा राहते, की राजकीय भूकंप होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.


दुसरीकडे आपच्या माजी नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केला आहे. 'आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत.... तेही लवकरच बघू..... आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची', असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे.