अंधेरी पोटनिवडणुकीत आणखी एक 'ट्विस्ट'

नेमकं काय आहे प्रकरण ?
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 28, 2022 15:31 PM
views 403  views

मुंबई : प्रतिष्ठेची मानली जाणारी अंधेरी पूर्व पोटनिवडणुक काही दिवसांवर येवून ठेपली असतानाच यात आणखी एक ट्विस्ट निर्माण झाले आहे. एका अपक्ष उमेदवाराने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप करून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.

ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्वची निवडणूक लढवली जात आहे. यामध्ये विरोधक भापजने माघार घेतल्यानंतर ही निवडणूक सोपी मानली  जात असली तरी ठाकरे गटासमोर पुन्हा एकदा नवी समस्या उद्भवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय सुकर मानला जात होता. मात्र, त्यानंतर आता एका अपक्ष उमेदवाराने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप करून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.

अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहित तक्रार केली आहे.  या पत्रात उमेदवारी मागे घेण्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ही पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी या केली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. धमकीही देण्यात आल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला. याशिवाय अन्य अपक्ष उमेदवारांवर दबाव टाकून त्यांनाही निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी तक्रार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.


अंधेरी पोटनिवडणुपूर्वी आयोगाने आचारसंहिताही लागू केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत. अशातच आता अंधेरी पोटनिवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.