..तर स्वतः मंत्री केसरकर देखील ईडी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत का?

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा सवाल
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 28, 2022 17:29 PM
views 368  views

सावंतवाडी : राणा आणि कडू यांच्या संघर्षात आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपांना गंभीरपणे घेणे क्रमप्राप्त आहे. तसेच आमदार बच्चू कडू यांच्याप्रमाणे स्वतः मंत्री केसरकर देखील ईडी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत का? हे देखील त्यांनी जनतेला सांगावे,न अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केलीय.   

डॉ. परूळेकर म्हणतात, आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामधील वाद आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे पुन्हा एकदा ५० खोक्यांचा प्रश्न महाराष्ट्रात ऐरणीवर आलेला आहे. आमदार बच्चू कडू यांनी या प्रकरणी स्वतःच्या ईडी चौकशीची मागणी केलेली आहे. आज उद्या ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कायदेशीर नोटीस देखील बजावणार आहेत. मग अशावेळी सर्वच पन्नास आमदारांना असे पन्नास पन्नास खोके मिळाले का? सदर पन्नास आमदारांची सुरत ते गुवाहाटी ते गोवा अशी फाइव्ह स्टार सरबराई करण्यात आली. त्याचा कोट्यवधी रुपयांचा खर्च कोणी केला? असे प्रश्न पुन्हा चर्चेत आलेले आहेत. सत्तेच्या जवळ असलेल्या आणि मंत्रीपदाची स्वप्न बघत असलेल्या आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपांना गंभीरपणे घेणे क्रमप्राप्त आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या बाबतीत खुलासा करणे आवश्यक आहे. असं काही घडलंच नसेल तर आमदार बच्चू कडू यांच्याप्रमाणे स्वतः मंत्री केसरकर देखील ईडी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत का? हे देखील त्यांनी जनतेला सांगावे.