
सावंतवाडी : शिक्षक भरतीत स्थानिकांतूनच ८० टक्के भरती व्हावी ही विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांची मागणी योग्य असून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार स्थानिक युवकांचीच भरती करावी या मागणीला आमचा सर्वांचा पाठिंबा असल्याचे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.
श्री. साळगावकर म्हणाले, शिक्षक भरती तसेच जिल्हा संवर्ग भरती पूर्ववत करण्यासाठी विधानपरिषदेत विधेयक आणत असल्याने स्थानिक बेरोजगार युवकांना जिल्ह्यामध्ये नोकऱ्या प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. हे यापूर्वी होणं आवश्यक होतं. परंतु, प्रमोद जठार यांनी योग्य भूमिका घेऊन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक आणत आहेत.
जिल्ह्यातील युवक नोकरी निमित्त सातत्याने पुणे, बेंगलोर, मुंबई, हैदराबाद, गोवा इथे स्थलांतरित होत आहेत. यामुळे जिल्ह्याची लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये घटत आहे. गावात युवक आढळत नाहीत. ही गाव वृद्धांची गाव म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. त्यामुळे युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी 80 टक्के भरती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच युवक युवतींची व्हावी या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.










