LIVE UPDATES

'त्या' आत्महत्येच्या प्रकरणाने सावंतवाडी हादरली

शालेय विद्यार्थ्यांनीची आत्महत्या ; नातलगाचाही दुर्देवी अंत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 22, 2026 16:06 PM
views 997  views

सावंतवाडी : मोती तलाव येथे कारिवडे येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यावेळी तीला वाचवण्यासाठी तीच्या वैभववाडी नाधवडेतील नातेवाईकानेही पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्यात बुडून दोघांचाही दुर्दैवी अंत झाला. आत्महत्या केलेल्या दोघांचेही मृतदेह सापडले असून पुढील सोपस्कारासाठी रूग्णालयात हलवले आहेत.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित युवक व विद्यार्थीचा मृतदेह सापडला आहे. ती युवती ही कारिवडे येथील शाळेत दहावी इयत्तेत शिकत होती. लिसा गोसावी अस तिच नाव असून शनिवारची सकाळची शाळा आटपून ती सावंतवाडीत आली होती. तिच्यासोबत तिची चुलत बहीण देखील होती.

यावेळी वैभववाडी नाधवडे येथील रोहन गोसावी हा त्यांचा नातेवाईक मुंबईहून तिला भेटण्यासाठी आला होता. सावंतवाडी मोती तलाव येथील बापुसाहेब महाराज पुतळ्या शेजारी ते थांबले होते‌. या कठड्यावर तलावाच्या दिशेने तोंड करून ती बसली होती. यावेळी अचानक तीने तलावात उडी घेतली. हे बघताच तिच्या चुलत बहीणीने रोहन गोसावी याला याची कल्पना देताच त्याने तीला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, यात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घडलेला प्रकार बघताच काहींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी युवक पाण्यात तरंगताना दिसून आल्याने त्याला बाहेर काढले. मात्र, तो मृत पावला होता. तर शालेय विद्यार्थीनी पाण्याखील गेल्याने तीचा मृतदेह बाहेर काढण्यास अडथळा निर्माण झाला होता.‌ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली-सांगेली रेस्कयू टीमला पाचारण केले‌. तर युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला. रेस्क्यू टीमने ड्रोनच्या सहाय्याने विद्यार्थीनीचा शोध घेतला. विद्यार्थीनचा मृतदेह आढळला असून तो बाहेर काढण्यात आला आहे.

मृतदेह पुढील सोपस्कारासाठी रूग्णालयात हलवला आहे. मात्र, शालेय विद्यार्थीनीने तलावात उडी का घेतली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांसह पोलीस हर्षद हिंगे घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेने सावंतवाडी शहरात खळबळ उडाली असून तलाव काठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.