LIVE UPDATES

पालकांनी मुलांच्या आवडीनुसार शैक्षणिक क्षेत्र निवडायला द्यावं : संजू परब

वेंगुर्ला शिवसेना व आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव संपन्न
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 30, 2026 17:31 PM
views 50  views

वेंगुर्ले : पालकानी मुलांना काय बनायचं आहे हे मुलांना ठरवायला द्या. त्यांची आवड बघा. माझ्या दोन्ही मुलींना मी त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडायला दिले. यातील एक वकील आहे तर एक आर्किटेक्टचे शिक्षण घेत आहे. शिक्षणात कुठे आर्थिक अडचणी येत असतील तर बँका सुद्धा पाठीशी उभे राहतात यात शिवसेना पदाधिकारी नेहमीच मार्गदर्शन करतील. आम्ही स्वतःचा व्यवसाय सांभाळून समाजकारण, राजकारण करतो. सध्या देशातील बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आपण पुढील वाटचालीत यात कसे टिकता येईल याचा विचार करा असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी वेंगुर्ले येथे केले. 

वेंगुर्ला तालुका शिवसेना व आमदार दिपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्या वतीने येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात जिल्हाप्रमुख संजू परब बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, पं स उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, नगरसेविका लिना म्हापणकर, तालुका संघटक बाळा दळवी, पं स माजी सभापती सुनिल मोरजकर, महिला आघाडीच्या शितल साळगावकर, अजित राऊळ, कौशिक परब, काशिनाथ नार्वेकर, मितेश परब, उमेश नाईक आदी उपस्थित होते.  या कार्यक्रमात सन २०२५- २६ या शैक्षणिक वर्षात १० वी व १२ वी मध्ये प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने भेटवस्तू, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात बोलताना सचिन वालावलकर म्हणाले, मुख्यमंत्री असताना अनेक लोककल्याणकारी योजना एकनाथ शिंदे यांनी आणल्या. मुलींना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षणात सवलती मिळाल्या पाहीजेत यासाठी त्यांनी काम केले. आतसुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे समाजहिताचे कार्य सुरू आहे. विद्यार्थ्यांनी फक्त शालेय जीवनातील प्रगतीवर न थांबता एखाद्या उच्च पदावर जाण्यासाठी प्रयत्न करावेत. शिवसेनेच्या माध्यमातून असे सामाजिक उपक्रम नेहमीच सुरू असतात. फक्त गुणगौरव वर न थांबता आमदार दीपक केसरकर विद्यार्थ्यांना येत असलेल्या अनेक अडचणींत त्यांच्या पाठीशी राहतात. असे वालावलकर यांनी सांगितले. 

उपसभापती सचिन देसाई यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्व पटवून सांगितले. आपण ज्यावेळी उज्वल यश संपादन करतो, त्यावेळी आपल्या पाठीवर थाप देणारे हात असेवावेत, पुढील वाटचालीत नवीन ऊर्जा मिळावी या उद्देदेशाने हा उपक्रम राबवलेला आहे. विद्यार्थ्यांच्या अंगीकृत कोणता गुण आहे किंवा कोणत्या क्षेत्रांत त्याला आवड आहे ही ओळखून पुढे वाटचाल केल्यास यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये आपले कमी विद्यार्थी पाहायला मिळतात. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उतरण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पुढे नियोजन केले जाईल. आपलं ध्येय उद्दिष्ट गाठण्यासायही ठाम निश्चय करून पुढे जा . शिवसेना पक्ष म्हणून नेहमी तुमच्या सोबत आहोत. असे ते म्हणाले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबा कोचरेकर यांनी तर आभार प्रदर्शन सत्यवान साटेलकर यांनी केले.