
देवगड : गौरी-गणपतीचा सण उत्साहात साजरा करून मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी देवगड एसटी आगारामार्फत विशेष बससेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १९ आणि २० सप्टेंबर २०२६ रोजी ५६ प्रवाशांचा ग्रुप उपलब्ध झाल्यास, संबंधित गावातून थेट मुंबईपर्यंत बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
खासगी बसच्या वाढीव तिकीट दरांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय म्हणून एसटी महामंडळाची ही सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर मुंबईला परतणाऱ्या प्रवाशांनी आपल्या गावातील ५६ प्रवाशांचा ग्रुप तयार करून या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड एसटी आगारामार्फत करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या विविध शासकीय सवलतींचाही प्रवाशांना लाभ घेता येणार आहे. महिला प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय लागू असलेल्या इतर सामाजिक सवलतींचाही लाभ घेता येणार आहे.
आपल्या गावातून थेट मुंबईपर्यंतचा परतीचा प्रवास ‘लालपरी’ने करा आणि सुरक्षित, आरामदायी व किफायतशीर प्रवासाचा लाभ घ्या, असे आवाहन देवगड एसटी आगाराने केले आहे.
संपर्क :
७९७२३१९९४४
८८८८३७१२५३
९७६२४०७०५१










