
सावंतवाडी : शेर्ले येथील ग्रामस्थांच्यावतीने प्रशांत जाधव यांनी ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या रस्त्याच्या चुकीच्या कामाबाबत उपोषण सुरू केले होते. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांना होत असलेल्या त्रासाबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या उपोषणाची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रशांत जाधव व ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केली. यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील यांनी खराब झालेल्या रस्त्याच्या लांबीमध्ये सिल्कोट पॅचचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच साईडपट्टीवरील झाडांची गणेश चतुर्थीपूर्वी कटिंग करून साईडपट्टी भरावाची दुरुस्ती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच पीडब्ल्यूडीचे डेप्युटी इंजिनिअर श्री. शेळके यांनी रस्त्याचे काम २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संजू परब यांच्या मध्यस्थीने प्रशांत जाधव व शेर्ले ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संजय परब यांनी घेतलेली भूमिका यावेळी महत्त्वपूर्ण ठरली. यावेळी उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस,माजी नगरसेवक गुरुदास मठकर,नायब तहसीलदार श्री. रविंद्र निपाणीकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.










