
सिंधुदुर्गनगरी :दूध उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने १० ते ११ जणांची समिती तयार करून दूध संस्थांच्या प्रतिनिधींची एकत्रित संघटना उभी करावी. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम व उपलब्ध सुविधांची माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांपासून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.
आपल्या भागातील व कार्यक्षेत्रातील किती शेतकरी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात, याचा अभ्यास करून प्रशिक्षणाचा पहिला टप्पा तातडीने तयार करणे आवश्यक आहे. शासनाच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळाला पाहिजे, यासाठी गोकुळ नेहमीच सकारात्मक भूमिका घेत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादनातील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा बँक, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, जि. प. भगीरथ प्रतिष्ठान तसेच दूध संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालय, ओरोस येथे पार पडली.
बैठकीस प्रमुख उपस्थित असलेले जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत व जि प उपाध्यक्ष दादा साईल यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच बैठकीस उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रदीप मालगावे, गोकुळ संस्थेचे अध्यक्ष गोडबोले, जिल्हा उप आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. समीर बिलोलीकर, भगीरथ ग्रामविकास प्रतिनिधी डॉ. प्रसाद देवधर, तसेच जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई उपस्थित होते.
आपल्या भागातील व कार्यक्षेत्रातील किती शेतकरी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात, याचा अभ्यास करून प्रशिक्षणाचा पहिला टप्पा तातडीने तयार करणे आवश्यक आहे. शासनाच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळाला पाहिजे, यासाठी गोकुळ नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असल्याचे मनीष दळवी म्हणाले
दूध व्यवसायातील खर्चाबाबत बोलताना दळवी म्हणाले की, ज्या ठिकाणी पूर्वी ७० पैशांचा खर्च अपेक्षित होता, तिथे आज १० ते १३ रुपयांपर्यंत खर्च जाऊन तो आता ८ रुपयांपर्यंत आणण्याचा प्रयत्न झाला आहे. दूध संस्थांनी आपल्या नफा-तोट्याचा विचार करून त्यानुसार योग्य निर्णय व त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
सुमारे १ हजार शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्या भोवती शेती, कृषीविषयक उपक्रम, दुग्ध उत्पादन, गांडूळखत तसेच क्लस्टर पद्धतीने विविध उपक्रम उभे करण्याची गरज आहे. या प्रक्रियेत महिला शेतकऱ्यांचीही विशेष निवड करून त्यांना सहभागी करून घेण्यावर भर देण्यात यावा.
शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणकोणत्या यंत्रणा उभ्या करता येतील, याचा विचार करून उपलब्ध योजनांचा प्रभावी उपयोग करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची निवड करून त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. गणेश चतुर्थीपूर्वी याबाबत सविस्तर चर्चा करून पुढील वर्षभराचा कृती आराखडा तयार करूया, असे आवाहन दळवी यांनी केले.
जिल्हा परिषद, भगीरथ प्रतिष्ठान, जिल्हा बँक, गोकुळ आणि दूध संस्था या सर्व घटकांनी समन्वयाने पुढील वाटचाल करावी. प्राथमिक टप्प्यात ज्या दूध संस्थांचे दूध संकलन मोठ्या प्रमाणावर आहे, त्या संस्थांमधील शेतकऱ्यांना चर्चेसाठी सहभागी करून घेण्यात येईल.बैठकीत दूध उत्पादन वाढविणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे आणि संबंधित सर्व विभागांच्या समन्वयातून जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला अधिक सक्षम करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.










