LIVE UPDATES

सिंधुदुर्गात पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 28, 2026 12:46 PM
views 146  views

सिंधुदुर्गनगरी : भारत देशाला पोलिओमुक्त दर्जा प्राप्त झाला असला, तरी ही स्थिती कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दि. २८ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे  बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे , कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी पालकांना आवाहन केले की, पाच वर्षांखालील कोणतेही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये. प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाड्या तसेच विशेष बूथवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २७ हजार ८०६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरात ९०४ लसीकरण केंद्रे, ८० मोबाईल पथके आणि ४३ ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार आहेत. तसेच २४९ उपकेंद्रे, ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११ उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यामार्फत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

तसेच दुर्गम भाग, स्थलांतरित कुटुंबे, वीटभट्ट्या व बांधकामस्थळांवरील बालकांपर्यंत विशेष पथकांद्वारे लसीकरण सेवा पोहोचविण्यात येणार आहे. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पालकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओचे दोन थेंब पाजून राष्ट्रीय मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.