LIVE UPDATES

शासकीय धान्य गोदामांतील कामे खासगी कामगारांकडे

सिंधुदुर्गनगरीत माथाडी कामगार आक्रमक
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 25, 2026 15:38 PM
views 22  views

सिंधुदुर्गनगरी : शासकीय धान्य गोदामांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनाची ठिणगी पडली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही माथाडी कामगार आक्रमक झाले आहेत. वाहतूकदारांच्या अ-नोंदणीकृत खासगी कामगारांकडून धान्य भराई-उतराईची कामे करून घेण्याच्या निर्णयाचा निषेध करत भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

शासनमान्य धान्य गोदामांमध्ये धान्य उतरविणे, भरणे, मोजमाप करणे तसेच रास्तभाव दुकानांपर्यंत धान्य पोहोचविण्याची कामे वर्षानुवर्षे माथाडी कामगारांमार्फत केली जात आहेत. मात्र शासनाने आता धान्य थेट दुकानदारांच्या ठिकाणी उतरविण्याचा निर्णय घेतल्याने ही कामे वाहतूकदारांच्या माध्यमातून खासगी कामगारांकडून करून घेतली जाणार आहेत. या निर्णयामुळे माथाडी कामगारांच्या हातातील रोजगार हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ८५ माथाडी कामगार शासकीय धान्य गोदामांमध्ये कार्यरत आहेत. नवीन धोरणामुळे हे सर्व कामगार बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर आले असून शासनाने तात्काळ निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच मजुरी व लेवीची रक्कम संबंधित कंत्राटदारांकडून माथाडी मंडळाकडे वेळेत जमा केली जात नसल्याने आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोपही संघटनेकडून करण्यात आला.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात सरचिटणीस सुनील मयेकर, शंकर गुरव, नंदकिशोर घाडीगावकर, नारायण शेल्टे, गंगाराम वारंग, यशवंत खडपकर, शंकर सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने माथाडी कामगार सहभागी झाले आहेत. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २७ मेपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

पुरवठा अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट

दरम्यान, आंदोलनस्थळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे आणि सहाय्यक पुरवठा अधिकारी मनीषा फटाले यांनी भेट देऊन माथाडी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित मागण्या शासनस्तरावरील असल्याने आंदोलकांचे निवेदन तात्काळ शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. याबाबतचे लेखी पत्रही माथाडी कामगारांना देण्यात आले.