LIVE UPDATES

Sindhudurg BJP News : पदाधिकाऱ्यांना नितेश राणे यांचा थेट इशारा

पक्षाची प्रतीमा खराब झाल्यास गय करणार नाही
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 18:47 PM
views 37  views

सावंतवाडी : सावंतवाडी व आसपासच्या परिसरात सुरू असलेले मटका, जुगार, दारू व ड्रग्जसारखे बेकायदेशीर धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. पक्षाची प्रतिमा खराब होत असेल तर ते खपवून घेणार नाही‌, त्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच हे प्रकार बंद न झाल्यास अवेळी आपण तुमच्याकडे पोहचू असा इशाराही दिला. तसेच या पदाधिकाऱ्यांना नीट करा अशी विनंती त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.

ते म्हणाले, 'आजुबाजूच्या राज्यातून आलेल ड्रग्स, मटका, जुगार जिल्ह्यात सुरू आहे. ते १०० टक्के उखडून टाकण्याच काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावं, केवळ पोलीसांवर अवलंबून राहू नका. सावंतवाडीतून याची सुरुवात करा, तिथेच सर्वाधिक गरज आहे‌. आपल्या काही पदाधिकाऱ्यांना नीट करावं अशी विनंती प्रदेशाध्यक्षांना करतो. अन्यथा, अवेळी त्यांच्याकडे पोहचलो तर पक्षाचे नाव खराब होईल‌. पक्षाच नाव खराब होत असल्यास कुणाची गय करणार नाही. पक्ष नशा मुक्तीची भुमिका घेतो, मी स्वतः अड्डयावर कारवाई करत असेल तर ते समजून आपले व्यवसाय, धंदे करावेत. हे प्रकार बंद न झाल्यास पुढच्या कार्यकारिणीत यादी वाचून दाखवणार‌, जिल्ह्याची अन् पक्षाची प्रतीमा खराब झाल्यास गय करणार नाही असा इशाराच त्यांनी दिला.

श्री. राणे पुढे म्हणाले,  जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन अत्यंत मजबूत असून, आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजयध्वज फडकणार आहे. विरोधकांकडे सध्या केवळ टीका करण्याचे काम उरले असून, निवडणुकांच्या मैदानात ते आमच्यासमोर टिकू शकत नाहीत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील संवाद आणि विश्वास अधिक दृढ करून भाजपचे संघटन गावपातळीवर अधिक मजबूत करावे.

अलीकडे झालेल्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहेत आणि समाजात कोणता संदेश घेऊन जायचा आहे, याचे स्पष्ट दर्शन आपल्या भाषणातून घडवले आहे. त्या विचारांचा अंगीकार करून आपण सर्वांनी समाजात काम केले पाहिजे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात भाजप कार्यकारिणीच्या ताकदीमुळेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वाधिक जागा बिनविरोध निवडून आणण्याचा पराक्रम शक्य झाला. येणाऱ्या जिल्हा बँक, ग्रामपंचायत आणि इतर निवडणुकांमध्येही उत्तम समन्वय राखून प्रत्येक सहकाऱ्याला ताकद देण्याचे काम केले जाईल.

निवडणुकीत पक्षविरोधात काम करणाऱ्या किंवा आपापसांतील मतभेदांमुळे नुकसान होणाऱ्या बाबी टाळल्या पाहिजेत. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि पक्षचिन्ह याशी प्रामाणिक राहून काम केल्यास जिल्ह्यातील एकही राजकीय पक्ष भाजपसमोर आव्हान उभे करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळात राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्याचे सर्व कार्यक्रम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले. 'मन की बात'सारखे संघटनात्मक उपक्रम आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार हे 'विकसित महाराष्ट्र २०४७'ची भक्कम पायाभरणी करत आहे. शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान, मच्छीमारांसाठीच्या योजना, पर्यटन विकास आणि रोजगाराच्या नवीन संधी या सर्व बाबी लोकांसमोर प्रभावीपणे मांडणे ही कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी आहे.

शिरोडा येथे येत असलेले नवीन पंचतारांकित हॉटेल, तळवणे येथे सुरू करण्यात आलेला जहाज बांधणी प्रकल्प तसेच  इतर विकास प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होत असून, परराज्यात गेलेला कोकणी तरुण पुन्हा आपल्या मातीकडे परतत आहे, हे ठणकावून सांगण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे सर्व वरिष्ठ नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे मिळालेल्या अधिकारांचा आणि डीपीडीसीच्या निधीचा उपयोग केवळ जनसेवेसाठी आणि संघटन वाढवण्यासाठीच झाला पाहिजे.

पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हिंदुत्ववादी विचारांशी आणि पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक राहून काम करेल आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपला राज्यात नेहमीच पहिल्या तीन क्रमांकांत ठेवेल, असा पुनरुच्चार नितेश राणे यांनी यावेळी केला.