LIVE UPDATES

दहावी निकालात कुडाळ तालुक्याचा डंका

९८ टक्के निकालासह दीया सामंत तालुक्यात प्रथम | कुडाळ हायस्कूलचा सुधांशू धुरी द्वितीय, तर पाटची शिवानी सर्वेकर तृतीय | १९ शाळांचा निकाल १०० टक्के
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 08, 2026 21:10 PM
views 290  views

कुडाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. या परीक्षेत कुडाळ तालुक्याने ९८ टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, पाट हायस्कूलची विद्यार्थिनी दीया निलेश सामंत हिने ५०० पैकी ४९९ (९९.८० टक्के) गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश मिळवले आहे.

तालुक्याची सांख्यिकी स्थिती

कुडाळ तालुक्यातून यावर्षी एकूण १,६०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १,५७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६४४ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी (Distinction) प्राप्त केली आहे. ५०७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ३०४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील एकूण १९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून शैक्षणिक क्षेत्रात तालुक्याचा दबदबा कायम राहिला आहे.

तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी

प्रथम: दीया निलेश सामंत (पाट हायस्कूल) – ९९.८०% (४९९/५००)

द्वितीय: सुधांशू महेश धुरी (कुडाळ हायस्कूल) – ९९.६०%

तृतीय: शिवानी मंगेश सर्वेकर (पाट हायस्कूल) – ९८.२०%

प्रमुख शाळांचा निकाल:

१) एस.एल. देसाई विद्यालय (पाट हायस्कूल):

या प्रशालेचा निकाल ९५.५३ टक्के लागला असून ११२ पैकी १०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दीया सामंत आणि शिवानी सर्वेकर यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवत शाळेचे नाव उंचावले. शुभंकर संदेश नाईक (९५.४०%) याने प्रशालेत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे १५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.

२) कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज:

येथून २०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ९८.५५ टक्के लागला आहे. सुधांशू महेश धुरी (९९.६०%) याने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी विलास सरनाईक, आर्या लक्ष्मण आगलावे आणि वरदा भाग्यविधाता वारंग या तिघींनी ९८ टक्के मिळवून द्वितीय क्रमांक, तर आयुषी सगुण केळूसकर (९७%) हिने तृतीय क्रमांक मिळवला. या प्रशालेतील १४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. "मुलींनी पुन्हा एकदा निकालात बाजी मारली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे," अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहेत.