
सिंधुदुर्ग : आपली सुरक्षा पोलीस अधीक्षकांनी कमी केली, या माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या आरोपांना आमदार निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुरक्षा कमी-जास्त करण्याचा अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नसून तो राज्य सरकारच्या गृह खात्याकडे असतो, एवढं अज्ञान एका दहा वर्षाच्या माजी आमदाराला आहे हे ऐकून खरं वाटलं नाही अशी टीका आमदार निलेश राणे यांनी केली.
“सुरक्षा कमी करायची, वाढवायची किंवा काढून घ्यायची याचा निर्णय जिल्ह्याच्या एसपींकडे नसतो. हा अधिकार राज्य सरकारच्या गृह खात्याकडे असतो. दहा वर्षे आमदार राहिलेल्या व्यक्तीला हे माहिती नसणे आश्चर्यकारक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर काही काळ सुरक्षा व्यवस्थेतील वाहनांमध्ये कपात करण्यात आली. पंतप्रधान स्वतः दोन गाड्यांच्या ताफ्यामध्ये फिरायला लागले. देशावरील संकट कमी होईपर्यंत सर्वांनाच हे करणे आवश्यक आहे. मागील दहा वर्षे मी कोणत्याही कॉन्स्टेबलशिवाय एकटाच फिरलो. घरात आमदार, केंद्रियमंत्री होते. तरीही मी एकटाच फिरायचो. आमदार झाल्यानंतर गृह खात्याला गरज वाटली असेल म्हणून त्यांनी सुरक्षा दिली असेल. असेही राणे यांनी स्पष्ट केले










