
कणकवली : गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणात दाखल होत असतानाच कणकवली तालुक्यातील नांदगाव ऑटोफाटा येथे रविवारी सकाळी 7 च्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बदलापूर येथून आचरा अडवली, मालवण येथे जाणारी कार रविवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास नांदगाव ऑटोफाटा येथे आली असता चालकाचा ताबा सुटून कार दुभाजकाला धडकली. या अपघातात आनंद दादू लाड (वय अंदाजे ७०, रा. नालासोपारा, मुंबई) यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कारमध्ये एकूण पाच प्रवासी प्रवास करत होते. अपघातात अन्य चार जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून मोठ्या प्रमाणात चाकरमानी व गणेशभक्त सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून, वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.या अपघाताबाबत कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.











