
वेंगुर्ले : देशभक्ती म्हणजे आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करणे होय, असे मत प्रा. वैभव खानोलकर यांनी नुकतेत लोकनेते ॲड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत संपन्न झालेल्या व्याख्यानात व्यक्त केले. 'व्यसनमुक्तीसाठी युवक' या संकल्पनेवर सात दिवसीय निवासी शिबीर नुकतेच तुळस येथे उत्साहात पार पडले.
यावेळी समारोपीय वैचारिक मंथनासाठी युवा व्याख्याते प्रा. वैभव खानोलकर यांना निमंत्रित केले होते. 'आजचा युवा आणि देशप्रेम' या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचनातून त्यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, देशाबद्दल नागरिक म्हणून असणारी कर्तव्ये आणि जबाबदारी मेडिकल कॉलेजच्या युवाईने स्वीकारायला हवी. भारताला जर महासत्ता बनवायचे असेल तर तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारला नावे ठेवण्यात व्यस्त न राहता, आपण निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले पाहिजे तर शासनकर्ती जमात बनून विविध पदांवर विराजमान होण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे. केवळ स्वप्न न बघता ते पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चिकाटीने अभ्यास केला पाहिजे. जगात जेव्हा जेव्हा क्रांती झाली, परिवर्तनाची लाट आली तेव्हा ते कार्य हे फक्त तरूणांनी केले आहे. स्वराज्याचे तोरण बांधणारे जाणते राजे शिवछत्रपती, शिकागोला भारतीय तत्त्वज्ञान ओजस्वी भाषेत मांडणारे योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद, पसायदान मागणारे ज्ञानेश्वर माऊली हे सगळे तरूण होते. तर पाश्चात्य देशांतही परिवर्तन करण्याची किमया युवा समाजसुधारकांनी केली आहे. 'देश हाच देव मानून' आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहून जर कार्य केले, तर निश्चितपणे ती देशभक्ती ठरेल. आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरुणाईची ताकद आणि सकारात्मक प्रयत्न करण्याची जबाबदारी या देशातील युवावरच असल्याची जाणीव त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना करून दिली.
या विचार सत्रात विचारमंचावर डॉ. कर्पे, विद्यार्थी प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. खानोलकर हे नेमळे पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यापक म्हणून सेवा देतात तर न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा येथेही ते कार्यरत आहेत. युवा व्याख्याते, दशावतार लोककला अभ्यासक, उपक्रमशील अध्यापक, सुप्रसिद्ध सूत्रसंचालक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.