
देवगड : शिष्यावृतीधारक विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षक भारतीने सामाजिक बांधिलकीतून मारलेली कौतूकाची थाप प्रेरणादायी आहे. शिष्यावृत्ती परिक्षा ही स्पर्धा परिक्षांची पहिली पायरी आहे मिळालेल्या प्रोत्साहनातूनच आगामी काळात आएएस आयपीएस दर्जाचे उच्च पदस्थ अधिकारी घडतील असे प्रतिपादन शिरगांव हायस्कूल शाळा समितीचे अध्यक्ष विजयकुमार कदम यांनी शिरगांव येथे केले.
शिक्षक भारती संघटनेच्यावतीने देवगड तालुक्यातील शिष्यावृत्तीधारक विद्यार्थी पालक मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात विजयकुमार कदम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना कदम म्हणाले ज्यांची कार्य विचार आणि कृती करण्याची पद्धती इतरांपेक्षा वेगळी असतात तेच विजेते ठरतात. कौतुकाची प्रेरणा घेऊन आपली बुद्धिमत्ता, विचारशक्ती आणि कृती जर अधिक वाहती ठेवली, प्रेरित ठेवली, तर आणखीन दैदिप्यमान यश संपादन करता येईल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आयुष्यात मोठे होताना समाजाबद्दल कणव, संवेदनशिलता नसेल तर त्या मोठपणाचा आणि शिक्षणाचा काहिही उपयोग नाही. सुख, समाधान, आनंद हे सामाजिक बांधिलकी आणि ऋणानुबंधावर अवलंबून असतात. जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मोठे होतो असे मार्गदर्शन केले.
यावेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक यांचा भेटवस्तू गौरवचिन्ह सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवर व पदाधिकारी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव समीर परब, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, उपाध्यक्ष सिद्धार्थ तांबे, देवगड तालुकाध्यक्ष हेमंत सावंत, शिरगांव हायस्कूल शाळा समिती सदस्य दिनेश साटम, शिरगांव केद्रप्रमुख बापू खरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रुपेश बांदेकर यांनी केले तर आभार सागर फाळके यांनी मानले.










