
वेंगुर्ला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन २०२६-२७ मध्ये राबविण्यासाठी शासनाकडून अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेत अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकऱ्यांना सिंचन क्षमता निर्माण करणे, सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे, जमिनीतील ओलावा टिकून ठेवणे या उद्देशाने शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी ४ लाख, जुन्या विहीर दुरुस्तीसाठी १ लाख, इनवेल बोअरिंगसाठी ४० हजार, वीज जोडणी आकार २० हजार, पंप संच ४० हजार, सोलार पंप ५० हजार अनुदान देण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत ज्या अनुसूचित/ नवबौद्ध शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्या नावे कमीत कमी ४० गुंठे व जास्तीत जास्त ६ हेक्टर जमीनधारणा आवश्यक आहे. जमिनीचा सातबारा उतारा, अनुसूचित जातीचा दाखला, आधार कार्ड, बँक खाते पुस्तकाचे पहिले पान, रेशन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
या योजनेच्या सन २०२६-२७ साठी अर्ज ऑनलाईन महाडीबीटी पोर्टल वर दाखल करायचा आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी केले आहे.










