
दोडामार्ग : तालुक्यातील सुपारी बागायतदार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे सुपारीची बेसुमार फळगळ होत आहे. बागांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक फळे गळून पडत असल्याने बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
सुपारीवर अर्थकारण अवलंबून असल्याने शेतकरी पुर्णपणे कोलमडून पडला आहे. सुपारी हे प्रमुख पीक आहे. सुपारीची गळ मोठ्या प्रमाणात झाल्याने बागायतदारांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. याचे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यात काजू, नारळ या पारंपरिक पिकांनंतर सुपारी हे महत्त्वाचे पीक म्हणून उदयास आले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सुपारीची लागवड केली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे व बदलणाऱ्या वातावरणामुळे तयार झालेली सुपारी गळून पडत आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी बागायतदार यांच्या वतीने अंकुश वेट यांनी केली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार 'कोळेरोग ' या रोगामुळे ही गळ होत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. अचानक आलेल्या उष्णतेनंतरच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. बागायतदारांची मागणी या संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदारांमधून होत आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी सुपारी बागायतदारांची व्यथा जाणून घेऊन सुपारी हे पीक नैसर्गिक आपत्तीत समाविष्ट करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी अंकुश वेट यांनी केली आहे











