
कणकवली : कणकवली तालुक्यातील कासरल येथील साई महिला ग्रामसंघ आणि मैत्री एकात्मिक शेती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भातशेतीतील काढणी व भात लावणीचा उपक्रम उत्साहात पार पडला.यावेळी भात लावण्याची एसआर लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले .या उपक्रमात कलमठ गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया संदीप मेस्त्री यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून श्रमदान करत महिला शेतकऱ्यांचा उत्साह वाढविला.यावेळी सरपंच स्नेहा परब, प्रभाग समन्वयक विठ्ठल परब, कृषी सहाय्यक तेली मॅडम, सीआरपी श्रद्धा बागवे, पाणी फाउंडेशनचे मनीष पेडणेकर, ग्रामसंघ सचिव प्रज्ञा सावंत, कोषाध्यक्ष पायल परब तसेच आशा सेविका मीनल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.उपक्रमादरम्यान सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या जीवामृत तयार करण्याचे व वापरण्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. यामुळे नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याबाबत महिला शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण झाली.यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री म्हणाल्या, "महिला शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढावा, तसेच शेतीमध्ये आधुनिक व सेंद्रिय पद्धतींचा अधिकाधिक वापर व्हावा, या उद्देशाने आम्ही आज प्रत्यक्ष शेतात उतरून या उपक्रमात सहभागी झालो आहोत. महिलांनी एकत्रितपणे शेती करत स्वावलंबनाचा आदर्श निर्माण करावा.या उपक्रमामुळे महिला बचतगटांमध्ये एकात्मिक शेती, सेंद्रिय शेती आणि सामूहिक श्रमसंस्कृतीबाबत सकारात्मक संदेश पोहोचला आहे. जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री यांच्या या भात लावणीत सहभागाबद्दल कौतुक होत आहे.










