
देवरुख : आंबव गावाच्या हद्दीत गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वप्नील जयराम पेडामकर (वय ३८, रा. सह्याद्रीनगर-साडवली) या उमद्या तरुणाचे डेरवण येथे उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या सोमवारी सायंकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या या अचानक आणि दुर्दैवी जाण्याने संपूर्ण सह्याद्रीनगर परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे.
शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी स्वप्निलवर गवारेड्याने अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरवातीला रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सह्याद्रीनगर मित्रमंडळाने दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला होता. उत्सव साजरा न करता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जमवलेला निधी स्वप्निलच्या उपचारासाठी देऊन त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते.
तीन दिवस डॉक्टरांचे प्रयत्न आणि सर्वांच्या प्रार्थना सुरू होत्या, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्याच्या पश्चात आई, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. ऐन उमद्या वयात स्वप्निलचा असा दुर्दैवी अंत झाल्याने साडवली-देवरुख परिसरातून अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.











