
वेंगुर्ला : शिरोडा गावात गेल्या १ महिन्यांपासून वीज पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. सतत लाईट ये-जा करत असल्याने पाणीपुरवठा करणारे पंप जाळाले आहेत. तसेच गावातील लोकांचे फ्रीज, टीव्ही, इन्व्हेंटर आदी इलेक्ट्रीक वस्तूवर परिणाम झाला आहे. हॉटेल, कोल्ड्रींक दुकानदानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावरील दिवे बंद असल्याने रात्री चोरी व अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाईट नसल्याने बँकेचे काम ठप्प होते.
स्मार्ट मिटर बसविल्याने ग्राहकांना भरमसाठी लाईट बील आलेली आहेत. तसेच स्मार्ट मीटर बसविल्यामुळे बीलाची मुदत संपल्यावर वीज पुरवठा बंद होतो. मीटर मध्ये टाकण्यात आलेली चीप मिटरमधुन काढून टाकावी. तसेच गावात नेटवर्क समस्या असल्याने रिचार्ज झाल्यावर २-३ तासांनी लाईट येते. स्माट मीटर बसविणे ऐच्छीक करावेत. जो ग्राहक मागेल त्यालाच द्यावेत. मागील तीन महिन्याचे व आताचे बील याची तुलनात्मक तपासणी करुन फरकाचे कारण दयावे. मागील असलेली थकबाकी हप्त्यामध्ये भरण्याची सवलत दयावी. अशी मागणी शिरोडा ग्रामपंचायत सरपंच लतिका रेडकर याही वेंगुर्ला विद्युत वितरण उपविभागीय कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत लवकरात लवकर दखल घेवून कार्यवाही करावी. अन्यथा ग्रामपंचायतीला व ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी उपसरपंच चंदन हाडकी, ग्रा प सदस्य मयुरेश शिरोडकर, पांडुरंग नाईक, जगन बांदेकर, रश्मी डीचोलकर आदी उपस्थित होते.










