
सावंतवाडी : शहरातील 57 कोटींच्या नळपाणी योजनेबाडत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले असून या निर्णयाचा आम्ही स्वागत करत आहोत अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिलीय. तर मुख्याधिकारी यांनी या योजनेवरती सुपरव्हीजन करण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना ठेकेदाराला कोणत्याही सूचना करायच्या नाहीत असे आदेश दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, शहराला दीर्घकाळ पाणी मिळण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 2018 ला मंजूर झालेल्या या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल नाशिक येथील कंपनीकडून तयार करण्यात आला होता. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही योजना मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेतली. मात्र, या योजनेचे शहरात झालेले काम अत्यंत धीम्या पद्धतीने सुरू होते. यावरती मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष देणं आवश्यक होतं. परंतू, मुख्याधिकारी यांनी या योजनेवरती सुपरव्हीजन करण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना सक्त आदेश दिले होते की, या योजनेवरती लक्ष ठेवायच. परंतू, ठेकेदाराला कोणत्याही सूचना करायच्या नाहीत. कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काही सांगायचं नाही. पालकमंत्र्यांनी या योजनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. या निर्णयाच्या आम्ही स्वागत करतो, या योजनेची सखोल चौकशी व्हावी.
तसेच टाकलेले पाईप कोणत्या पद्धतीचे आहेत ? त्याचा थिकनेस तपासावा, त्याचबरोबर खोदाई करून किती फुटावरती पाईपलाईन टाकायची होती ? याचाही अहवाल तयार व्हावा. तसेच पाईपलाईन टाकताना त्यामध्ये वाळू, ग्रीड, ग्रॅव्हील दगड टाकले गेले का ? याचीही सखोल चौकशी करावी. तसेच वापरण्यात आलेले पाईपलाईन कंट्रोलची चौकशी, धरणावरील बांधण्यात आलेली फिल्टरेशन प्लांटची, ग्रॅव्हिटी तसेच जुनी ग्रॅव्हिटी तपासून घ्यावी. इथेच मोठा घोळ झालेला असून ते सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे 'थर्ड पार्टी ऑडिट' करत अधिकाऱ्यांवरती लक्ष द्यावा, पालकमंत्र्यांच्या या निर्णयाच्या स्वागत करतो अस मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.










