
सावंतवाडी : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथील धबधबा आज पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे वनविभागाकडून हा निर्णय घेण्यात आला होता. तर उद्या पावसाचा अंदाज घेऊन धबधबा सुरू ठेवावा का ? यावर निर्णय घेणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी दिली.
सध्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे. अतिवृष्टीमुळे धबधब्याचा प्रवाह अत्यंत तीव्र झाला असून पाण्यासोबत लहान-मोठे दगड वाहून येण्याची शक्यता असते. हे दगड पर्यटकांच्या अंगावर कोसळून दुर्घटना घडण्याची भीती असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पावसाचा जोर ओसरल्यानंतर आणि परिस्थिती सामान्य झाल्यानंतर धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल, उद्याच्या वातावरणाचा अंदाज घेऊन कार्यवाही केली जाईल अशी माहिती उपवनसंरक्षक श्री. शर्मा यांनी दिली आहे.










